हिवरखेड (धिरज बजाज ): हिवरखेड हे विदर्भातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेले आणि भौगोलिक दृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व असलेले गाव असून अकोट मतदारसंघातील मध्यवर्ती केंद्र म्हणून ओळखल्या जाते.
स्वतंत्र भारताच्या इतिहासात फक्त दोघांनाच आमदारकीची संधी मिळाली.
स्व. डॉ. का. शा. तिडके आणि दे. संपतरावजी भोपळे ह्या दोन्ही मान्यवरांनी आमदारकीच्या काळात आपली छाप पाडली. परंतु त्यानंतर प्रदीर्घ काळापासून आज पावतो हिवरखेडच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांना प्रमुख राजकीय पक्षांची उमेदवारी न मिळाल्याने राजकारणात केंद्रस्थानी असणाऱ्या हिवरखेड च्या एकाही नेत्याला आमदार बनण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे हिवरखेड परिसर कायमच विकासापासून कोसो दूर राहिला आहे.
हिवरखेड ग्रामपंचायतचे नगर पंचायत मध्ये रूपांतर, हिवरखेड नवीन तालुका निर्मिती, अकोट- खंडवा ब्रॉडगेज प्रकल्प, सर्व प्रमुख रस्त्यांची दयनीय अवस्था, सायन्स कॉलेजचा अभाव, बंद असलेली जिनिंग-प्रेसिंग फॅक्टरी, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीची बंद असलेली हिवरखेड उपबाजार पेठ, बहुतांश शेतरस्त्यांची दुरावस्था, पर्याप्त बस सेवांचा अभाव, अशा शेकडो समस्या आणि विकास कामे हिवरखेड येथून गेलेला हक्काचा आमदार न लाभल्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
परंतु आता अकोट मतदार संघाच्या उमेदवारीसाठी हिवरखेड च्या शिलेदार सज्ज झाले असून तब्बल सहा नेत्यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. इच्छुकांमध्ये काँग्रेस 3, भाजप 2, शिवसेना 1 असा समावेश आहे.
लोकजागर मंचच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात अनेक सामाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे आणि जनजागृती करणारे अनिल गावंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्याहस्ते शिवबंधन बंधन नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे त्यामुळे अकोट मतदार संघात शिवसेनेकडून त्यांची दावेदारी सर्वात मजबूत मानली जात आहे. मंत्रालय स्तरावर आणि सर्वच पक्षाच्या मोठ्या नेत्यांमध्ये त्यांची चलती असून कोणतेही काम पूर्ण करून आणण्यात त्यांना तोड नसल्याचे बोलले जाते. लोकजागर मंच द्वारा त्यांनी मोठे संघटन उभे केले आहे. भाजपाने स्थानिकांना उमेदवारी द्यावी ह्यासाठी हिवरखेड मधून बाळासाहेब नेरकर आणि कृष्णा तिडके या दोघा नेत्यांनी उमेदवारी मागितली आहे. वंचित घटकातील बारा बलुतेदारांचे आणि दिव्यांगांचा प्रतीनिधी म्हणून संधी मिळावी असा बाळासाहेब नेरकर यांचा आग्रह आहे. सुरुवातीपासून भाजपचा एकनिष्ठ, हाडाचा, जमिनी कार्यकर्ता आणि गल्ली ते दिल्ली पर्यंतच्या बड्या नेत्यांसोबत जवळीक हि नेरकर ह्यांची जमेची बाजू आहे.
कृष्णा तिडके हे माजी आमदार डॉ. का.शा. तिडके यांचे सुपुत्र असून लहानपणापासूनच त्यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले आहे. डॉ. का.शा. तिडके स्मृती प्रतिष्ठान मार्फत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा हाती घेतला आहे. सध्या भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा सचिव आहेत.
काँग्रेसचे एकनिष्ठ जेष्ठ नेते मुन्नाभाई उर्फ शोएब अली मिरसाहेब यांनी उमेदवारी मागितली असून माजी जि.प. सभापती, सेन्सॉर बोर्डाचे सदस्य, अशी अनेक पदे भूषविली असून सध्या ते ऑल इंडिया काँग्रेस सेवा दलाचे राष्ट्रीय सचिव आणि मध्य प्रदेश सेवादलाचे प्रभारी आहेत. राहुल गांधी आणि सोनिया गांधी सोबत थेट संबंध आणि राष्ट्रीय स्तरावरचे कार्य यावरून काँग्रेसमध्ये त्यांची पोहोच लक्षात येते. साधी राहणी, मीतभाषी, विनम्र स्वभाव आणि राजकारणाचा दांडगा अनुभव ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.
काँग्रेसशी पारंपरिकरित्या एकनिष्ठ असलेल्या भोपळे कुटुंबातील श्यामशील सहदेवरावजी भोपळे ह्यांना राजकारणात प्रचंड बुद्धिजीवी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. माजी आमदार दे. संपतरावजी भोपळे यांचे ते पुतणे आहेत. सर्वात मुत्सद्दी, चतुर, मृदभाषी, कोणत्याही गंभीर समस्येचे संवादातून निराकरण करण्याचे बेजोड कौशल्य त्यांना आत्मसात आहे. सर्वगुण संपन्न चाणक्य राजकारणी म्हणून ओळख, अनेक संस्थांच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क, शैक्षणिक क्षेत्रात पैठ, अशा अनेक जमेच्या बाजू आहेत. काँग्रेस ने यावेळी ओबीसीला संधी द्यावी या विश्वासातून श्यामशील भोपळे यांनी उमेदवारी मागितली आहे.
काँग्रेसचे युवा चेहरा म्हणून माजी पंचायत समिती सदस्य, माजी सोसायटी सभापती, मनिष विलासराव भांबुरकर यांनी उमेदवारीवर दावा ठोकला आहे. आदिवासी क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी, लोकोपयोगी उपक्रमात अग्रेसर, सतत जनतेच्या संपर्कात राहणे, जनतेशी नाळ जुळलेला नेता, गल्ली ते दिल्ली च्या नेत्यांसोबत जवळचे संबंध, मंत्रालयापर्यंत पोहोच, इत्यादी अनेक जमेच्या बाजू आहेत.
आता अकोट मतदार संघातील विकास वंचीत हिवरखेड परिसरातील नेत्यांना कोणकोणता पक्ष उमेदवारीची संधी देतो याकडे संपूर्ण अकोट मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.