मुंबई :
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिस प्रत्येकाची कसून चौकशी करत आहेत. आतापर्यत मुंबई पोलिसांनी ३० जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात सुशांत सिंह राजपूतची मैत्रिण रिया चक्रवर्ती, संदीप सिंह आणि यशराज फिल्म्सचे कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांचा देखील समावेश आहे. तर सध्या बॉलिवूड चित्रपट निर्माते संजय लीला भन्साळी यांना वांद्रे पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलविण्यात आले होते. सलग तीन तास चाललेल्या चौकशीत संजय लीला भन्साली यांनी सुशांतसिंह राजपूतशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टीचा खूलासा केला आहे.
संजय लीला भन्साली यांनी सांगितले की, ‘सुशांत सिंह राजपूतला ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ चित्रपटांमध्ये घ्यायचे होते. यामुळे सुशांतला ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या चित्रपटाची ऑफरही दिली होती. परंतु नंतर सुशांतच्या जागी रणवीर सिंहला रिप्लेस केले गेले. ‘बाजीराव मस्तानी’ साठी ही सुशांतची पहिली पसंत होती. परंतु यावेळी आम्हा दोघांमध्ये कोणताही संवाद साधला गेला नाही. यामुळे यशराज फिल्म्सच्या करारामुळे सुशांत सिंह राजपूत ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘गोलियों की रासलीला: रामलीला’ या दोन चित्रपटात काम करू शकला नाही. याशिवाय सुशांत सिंह राजपूतने यशराज फिल्म्सच्या माध्यमातून ‘काय पो छे’ या चित्रपटाने आपल्या करिअरची सुरूवात केली. यानंतर सुंशात ‘शुद्ध देसी रोमांस’ यासारख्या चित्रपटाकडे वळला.’
यापुढे संजय लीला भन्साली यांनी सांगितले की, येथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट म्हणजे, सुशांत सिंह राजपूतप्रमाणेच रणवीर सिंहनेही यशराज फिल्मशी करार केला होता. रणवीर सिंहनेही आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात यशराज फिल्म्सपासून केली होती.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांच्या चौकशीदरम्यान संजय लीला भन्साली यांनी २०१६ मध्ये सुशांत सिंह राजपूतसोबत झालेल्या भेटीचा उल्लेखही केला आहे. तेव्हा त्याला ‘रामलीला’ आणि ‘बाजीराव मस्तानी’ मध्ये काम करण्याची ऑफर दिली होती.