पुणे : राज्यात वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बैठक सुरू झाली आहे. अद्याप बैठकीत काय चर्चा सुरू हे समजलेले नाही. मात्र, जनतेमध्ये लॉकडाऊनवरून संभ्रमता निर्माण झाली आहे. दरम्यान, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्षाचे प्रमुख या तिघांनी लॉकडाऊनसंदर्भात विचार केलेला नाही. या सगळ्या परिस्थितीत अधिक कडक निर्बंध कसे लावता येतील यावर चर्चा होणार आहे. कालच यावर नव्याने धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आमच्या विभागाकडून फाईल गेली आहे. अंतिम निर्णय आज संध्याकाळपर्यंत होईल.
तसेच लोकलविषयी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, लोकलसंदर्भात मागील वर्षी आपण निर्णय घेतला होता. आपण विभागणी केली असून वेळेनुसार प्रवासाला मुभा दिली आहे. त्यामध्ये मग आरोग्य विभाग, रेस्टाॅरंट, कर्मचारी, चाकरमानी यांचा समावेश होता. ज्या मागील वेळी उपाययोजना केल्या होत्या यावेळीही तशीच करणार आहोत. मात्र, लोकल बंद होणार नाही, पण त्यावर निर्बंध लावले जातील आणि त्याचे वेगळ्या पद्धतीने नियोजन केले जाणार आहे. गर्दी कमी करुन लोकांना सुविधा देण्यावर भर असेल, असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.