अहमदनगर : राज्यात सध्या अनलॉकचा ५ वा टप्पा सुरू झाला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या ६ महिन्यांपासुन देशासह राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. गेल्या दोन महिन्यांपासून केंद्राकडून टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथिल केला जात आले. मात्र, राज्य सरकारने काही गोष्टींमध्ये शिथिलता देऊन लॉकडाऊन कायम ठेवला होता. त्यामुळे अनलॉकवरून जनतेमध्ये संभ्रमता निर्माण झाली होती. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्याचे संकेत दिले आहेत.
राज्यात टप्प्याटप्प्याने शाळा, धार्मिक स्थळे, व्यायामशाळा उघडण्यात येतील आणि नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होईल, अशी अपेक्षा राजेश टोपे यांनी व्यक्त केली. नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार असल्या कारणाने आता आपल्याला अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. आपल्याला कोरोनासोबत जगायचं आहे. या कोरोनाकाळात सर्वांना सर्व नियमांचे पालन काटोकोर पाळणे गरजे आहे, असे राजेश टोपे यांनी अहमदनगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
महाराष्ट्रात आत्तापर्यंत १२ लाख २९ हजार ३३९ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज दिला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ८१.६३ टक्के इतके झाले आहे. सध्या राज्यात २ लाख ३६ हजार ४९१ रूग्ण ॲक्टिव्ह आहेत.