नवी दिल्ली :
देशात कोरोना रुग्णसंख्येचा उद्रेक सुरुच आहे. गेल्या २४ तासांत तब्बल ८९ हजारांहून अधिक रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यामुळे देशातील रुग्णसंख्येने ४३ लाखांचा टप्पा पार केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ८९ हजार ७०६ रुग्णांची नोंद झाली. तर १,११५ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे देशातील रुग्णसंख्या ४३ लाख ७० हजार १२९ वर पोहोचली आहे.
देशात सध्या ८ लाख ९७ हजार ३९४ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३३ लाख ९८ हजार ८४५ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात आतापर्यंत ७३ हजार ८९० लोकांचा बळी घेतला आहे.
देशात ८ सप्टेंबर रोजी ११ लाख ५४ हजार ५४९ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत ५ कोटी १८ लाखांहून चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.