अकोला: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे ( सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था )अंतर्गत “संविधान साक्षर ग्राम” हे संकल्पनापर अभियान राबविण्याकरीता अकोला जिल्ह्यातील ग्राम बाभुळगाव जहाँ. व यावलखेड चाचोंडी या दोन गावाची सर्वानुमते निवड केली होती. सदर अभियानादरम्यान श्री. कैलास कणसे (महासंचालक, बार्टी पुणे), श्रीमती. प्रज्ञा वाघमारे (मुख्य प्रकल्प संचालक (समतादूत प्रकल्प बार्टी पुणे), श्री. राहुल कऱ्हाडे (सहा.प्रकल्प संचालक अमरावती विभाग)यांच्या प्रमुख मार्गदर्शनात ग्राम बाभुळगाव जहाँ. व यावलखेड या गावात २६ नोव्हेंबर २०१९ संविधान दिनापासून ते २७ डिसेंबर २०१९ पर्यंत “बार्टी” ने दिलेल्या नियोजनाप्रमाणे समतादूत प्रकल्प टीम अकोल्याच्या वतीने दररोज वेगवेगळे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक माहितीवर्धक प्रबोधनात्मक जनजागृतीपर उपक्रम ग्रामस्थांसाठी राबविल्या गेले.उपक्रमादरम्यान दररोज संबंधित विषयाला मार्गदर्शक म्हणून अकोल्यातील शासकीय तसेच तज्ञ, नामवंत विचारवंत, मार्गदर्शक मंडळीनी आपली उपस्थिती लावली.
या विशेष उपक्रमादरम्यान समतादूत टीम च्या माध्यमातून “संविधान साक्षर ग्राम” बाभूळगाव जहाँ. व यावलखेड येथे संविधान उद्देशिका वाचन व अर्थ समजून सांगणे, स्वच्छता अभियान, सांडपाणी मार्गदर्शन, “बार्टी” मार्फत चालविले जाणारे उपक्रम, शेतकरी बांधवांसाठी शासनाच्या कृषी विषयक योजना, संविधान व संविधानातील मूल्ये याबाबत मार्गदर्शन, स्मशानभूमीत वृक्षारोपण व स्वछता अभियान, बचत गट संदर्भात माहिती, आरोग्य शिबीर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण योजनांची माहिती, विधवा, परीतक्त्या, विकलांग महिलांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती, महिला सक्षमीकरण, विद्यार्थ्यांसाठी “माझे गाव” या विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा, संविधान आधारित एकदिवसीय चर्चासत्र, बालविवाह प्रतिबंध कायदा व बालमजुर कायदा, व्यसनमुक्ती पर कार्यक्रम, भव्य रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी शिबीर, संविधान या विषयावर आधारित विद्यार्थ्यांसाठी “निबंध स्पर्धा”, युवक युवतीसाठी शैक्षणीक व रोजगार विषयक मेळावा, मानवतेची शिकवण या विषयावर आधारीत प्रबोधनात्मक कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, माहिती अधिकार अधिनियम २००५, संविधानातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये अशा विविध विषयांवर आधारित प्रबोधन व माहितीवर्धक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
“संविधान साक्षर ग्राम” या उपक्रमाचा “समारोपीय कार्यक्रम” ग्रामस्थांच्या सहकार्याने संपन्न झाला. यावेळी गावातील शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, जेष्ठमंडळी, सामाजिक कार्यकर्ते, समाजसेवक, आशाताई, बचत गट सेविका ह्या उपस्थित होत्या. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तद्नंतर प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच मान्यवरांनी व समतादूत टीम सदस्य यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनतर उपक्रमादरम्यान आयोजित केलेल्या स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विध्यार्थ्यांना अकोला समतादूत प्रकल्पाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते “बार्टी” चे प्रशस्तीपत्र, पुस्तक व बक्षीस म्हणून शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच गेल्या एक महिन्यापासून या उपक्रमाला सहकार्य करणाऱ्या गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा शालेय शिक्षक वृंदाचा संविधान उद्देशिका व पुस्तके भेट देऊन सत्कार करण्यात आला. यासोबतच गावातील ग्रामपंचायत, बुद्ध विहार, शाळा, महाविद्यालयाला “संविधान” पुस्तक प्रत भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमाला मुख्याद्यापक, शिक्षक, गावातील प्रतिष्ठित नागरिक व विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उपक्रम यशस्वी करण्यासाठी गेली एक महिना समतादूत टीम सदस्य अकोला जिल्हा प्रकल्प अधिकारी विजय बेदरकर, समतादूत टीम सदस्य ऍड. वैशाली गवई, प्रज्ञा खंडारे, रविना सोनकुसरे, समता तायडे, विनोद सिरसाट, मनेश चोटमल, उपेंद्र गावंडे, बालाजी गिरी यांनी अथक प्रयत्न केले व संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने उपक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. कार्यक्रमाची सांगता संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करून झाली.