अकोला, दि.५- कोरोना संसर्गाचा प्रतिबंध करण्यासाठी विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकऱ्यांना तालुक्याच्या ठिकाणी येऊन गर्दी करावी लागू नये, म्हणून शेतकऱ्यांना थेट त्यांच्या बांधापर्यंत कृषि निविष्ठा( बियाणे, खते, किटकनाशके इ.) पोहोचविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी लागणाऱ्या या निविष्ठ थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास शेतकरी गटांनी सुरुवात केली असून जिल्ह्यात ठिकठिकाणी कृषि निविष्ठा शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविल्या जात आहेत. आत्मा प्रकल्पा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या शेतकरी गटांमार्फत हा उपक्रम राबविण्यात येत असून शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक मोहन वाघ यांनी केले आहे.
बार्शी टाकळी तालुकाः- तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शीटाकळी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा बार्शीटाकळी अंतर्गत शेतकऱ्याच्या बांधावर खते/ बियाणे/ कीटकनाशके हा उपक्रम राबवित आज मौजे कान्हेरी,ता बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील शेतकऱ्यांना निविष्ठा पोहच करण्यात आल्या व्यक्तिगत अंतर राखण्याच्या नियमाचे पालन करीत गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित येत माऊली कृषी सेवा केंद्र बार्शीटाकळी येथून ५० बॅग सोयाबीन बियाणे,३० बॅग खते १५ लिटर कीटकनाशक, २० लिटर तणनाशक या कृषी निविष्ठांची खरेदी केली.
अकोला तालुकाः- अकोला तालुक्यातील मौजे बहिरखेड,खरप, गोणापुर, पळसो,दापुरा, कासली,दोनवाडा, वडद येथील शेतकरी गटांनी आपातापा येथुन १२३५ बॅग सोयाबीन वाण JS३३५ बियाणे, MOP, १०;२६;२६ , DAP , SSP, UREA, १२.३२.१६ एकुण ९०८७ खतांच्या बॅग खरेदी करुन पोहच करून देण्यात आल्या. शेतकऱ्यांनी गटाकडे नोंदणी केल्यानुसार शेतकऱ्यांना निविष्ठा कोणत्याही प्रकारची वाहतूक भाडे,हमाली नघेता थेट गावात पोहच करण्यात आल्या. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) मोहन वाघ, उपविभागीय कृषि अधिकारी कुळकर्णी, तालुका कृषी अधिकारी प्रधान, मंडळ कृषि अधिकारी फुलारी, तालुका आत्मा अध्यक्ष भरत काळमेघ, आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व्हि.एम.शेगोकार, श्रीमती ए.पी.पेटे,कृषी सहा.अनील वानखडे व शेतकरी गटाचे अध्यक्ष उपस्थित होते.
तेल्हारा तालुकाः- गणेश कृषी सेवा केंद्र तेल्हारा येथून मौजे शेरी वडनेर व शेरी बुद्रुक येथे दोन शेतकरी गटांना एकूण ५८ बॅग खताचा पुरवठा त्याच्या गावात त्यांच्या बांधापर्यंत करण्यात आला. या उपक्रमामुळे शासनाने ठरवून दिलेल्या रास्त दरातच कृषी निविष्ठा शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांची कुठेही फसवणूक होणार नाही व कोणाचा प्रादुर्भाव टाळण्यास सुद्धा मदत होईल त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.
अधिक वाचा: महाराष्ट्रातील मजुरांचा प्रवास खर्च महाराष्ट्र काँग्रेस करणार









