राज्यात आज (दि.28) 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर रविवारी (दि.30) उर्वरित 88 बाजार समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, एकूण 253 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूकांपैकी 18 बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
या बाबत माहिती देताना प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे म्हणाले, प्राधिकरणाने 21 मार्चच्या आदेशानुसार 253 कृषि उत्पन्न बाजार समित्याची निवडणूक प्रक्रिया सुरू केली होती. त्यातील 18 बाजार समित्यांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. उर्वरित 235 बाजार समित्यांसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकी अंतर्गत एकूण 4 हजार 590 जागा निवडून द्यायच्या आहेत आणि उमेदवारांची संख्या 10 हजार 345 इतकी आहे. त्यापैकी सहकारी संस्थांच्या मतदार संघामध्ये 2 हजार 805 जागांपैकी 18 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित जागांसाठी 6 हजार 230 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
ग्रामपंचायतींच्या मतदार संघात 1 हजार 20 जागांपैकी 21 जागा बिनविरोध झाल्या असून 2 हजार 457 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. व्यापारी/अडते मतदार संघात 510 जागांपैकी 49 बिनविरोध तर उर्वरित जागांसाठी 1 हजार 52 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हमाल/मापारी मतदार संघामध्ये 255 जागांपैकी 64 जागा बिनविरोध झाल्या असून 606 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
28 एप्रिल रोजी मतदान होणार्या 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांपैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी 28 एप्रिल रोजी, 95 समित्यांची मतमोजणी 29 एप्रिल रोजी तर 15 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी रोजी होणार आहे. 88 पैकी 78 समित्यांची मतमोजणी 30 एप्रिल रोजी तर 10 समित्यांची मतमोजणी 1 मे रोजी होणार आहे, असेही डॉ. खंडागळे यांनी सांगितले.