पातूर (सुनिल गाडगे)- एज्युविला पब्लिक स्कूल पातुर येथे पर्यावरण पूरक शाडू मातीचे गणपती देशी झाडांच्या बियांनी कलाकुसर करीत तयार करण्याची कार्यशाळा आयोजित केल्या गेली.
आपल्या जीवनात आपण निसर्गास हानिकारक अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश कळत नकळत केला आहे ,त्यापैकी ज्या वस्तू आपण सहज पर्यायी मार्गाने बदलून पर्यावरण संवर्धनास मदत करतील अशा संकल्पनेचा अंगीकार केला पाहिजे. त्यातीलच एक संकल्पना म्हणजे पर्यावरण पूरक मातीचे गणपती…. दरवर्षी आपण गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतो व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती आणून स्थापना करून तिची मनोभावे पूजा करतो, परंतु विसर्जना वेळी ती मूर्ती पाण्यात विरघळत नाही आणि पाण्याचे स्त्रोत दूषित होतात याकरीता एक सकारात्मक पाऊल म्हणून एज्यूविला पब्लिक स्कूल पातुर येथे पर्यावरण पूरक गणेशा या संकल्पनेवरील कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला व मातीचे गणपती बनवून त्यात देशी झाडांच्या बियाचा सजावटीकरीता वापर करण्यात आला. जेव्हा मातीची मूर्ती विसर्जित होईल तेव्हा त्यातून झाडाचे रोपटे विसर्जन स्थळी उगवेल व गणेशोत्सव सोबतच वृक्षारोपण होईल. सदर कार्यशाळेचे आकर्षण म्हणजे अवघ्या सात वर्षाच्या पूर्वा बगळेकर हिने इको फ्रेंडली गणेशा कार्यशाळेला प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. पूर्वा बगळेकर ही स्वतः बालकलावंत असून तिने गणेश मूर्ती कशी बनवायची त्याचे प्रात्यक्षिक अगदी सोप्या भाषेत सांगून सर्वांना अवाक केले व मुलांना माती, जल, वृक्षारोपण, वृक्ष संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. या कार्यशाळेस पातुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय नाफडे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व येणाऱ्या गणेशोत्सवात पर्यावरण पूरक गणपती स्थापन करण्याचे आवाहण केले. उत्कृष्ट गणेश मूर्ती मधून प्रथम क्रमांक खुशी उगले व दर्शन उगले या दोघा भावंडांना, द्वितीय क्रमांक करण पवार तर तृतीय क्रमांक सारिका पोहरे या विद्यार्थ्यांनी पटकावला. कार्यक्रमाचे आयोजनाकरीता शाळेच्या मुख्याध्यापिका व विश्वस्त विद्या निलेश गाडगे यांनी पुढाकार घेतला तसेच सविता ठाकरे, प्रीती शेलुडकर, नीता ठाकरे, भाग्यश्री इंगळे,शितल फुलारी, जयश्री वानखडे,नम्रता बगाडे, पूजा इंगळे, सुवर्णा कुकडकर, स्नेहल इंगळे, विजया तायडे, कीर्ती बंड, सविता वानखडे, प्रतिमा अंधारे, सुषमा इनामदार, नूतन भालेराव, सुषमा पोरे, प्रवीण पाचपोर, आकाश गुलालकरी, आनंद वडतकर, नंदा धानोरकार, प्रभा दांडगे, रंजना बोरकर, ज्योती मुठाळ, विजय गाडगे, गणेश पाटील सय्यद शोएब व सय्यद साजिद यांनी परिश्रम घेतले.