मुंबई : गेल्या वर्षीच्या तुलनेत पावसाळा एक आठवडा आधी सुरु होण्याचा अंदाज देऊन वेधशाळेने दिलासा दिला असला तरी, सध्या उन्हामुळे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने राज्यातील विविध धरणांमधील जलसाठा 25 टक्क्यांनी कमी झाला आहे. यंदा राज्यात पाऊसकाळ चांगला झाल्याने धरणांमधील पाण्याची पातळी उंचावली होती.
एप्रिलच्या सुरुवातीला राज्यातील धरणांमध्ये 62 टक्के पाणीसाठा होता. मात्र, गेल्या महिनाभरातील उन्हाच्या झळा आणि वाढलेल्या तापमानामुळे हा पाणीसाठा कमी होऊ लागला आहे. बाष्पीभवनामुळे राज्यातील सर्व धरणातील सुमारे 25 टक्के पाणी आटले आहे. राज्यातील 3 हजार 267 जलाशयांमध्ये 62 टक्के पाणी उपलब्ध होते. ते आता 38.7 टक्के झाले आहे. गेल्यावर्षी याच दिवशी हा पाणीसाठा 37.89 टक्के इतका होता. म्हणजेच गेल्या वर्षीपेक्षा यंदा पाणी कमी झाले आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातील सचिवांनी दिली.
राज्यातील 141 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 10636 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असून हा 36.71 टक्के इतका आहे. 258 मध्यम प्रकल्पांमध्ये 2500.52 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. 2868 लघु प्रकल्पांमध्ये 264321 दशलक्ष घनमीटर इतका उपयुक्त पाणीसाठा असून हा 41.34 टक्के इतका आहे. गेल्यावर्षी हाच पाणीसाठा खूपच कमी म्हणजे 30.42 इतका होता.