हिवरखेड-
कोरोनामुळे गेली दोन वर्षे लोकांच्या जीवनपध्दतीवर निर्बध आले होते. त्यामध्ये सुख दु:खाच्या प्रसगांनाही नियमांच्या अधीन राहून सामोरे जावे लागत होते. त्याला लग्न समारंभही अपवाद नव्हते. इच्छा असुनही लोकांना निमंत्रण देता येत नव्हते. अनेकदा लग्न करून वधु वर घरी आल्यानंतरच कॉलनीत किवा गल्लीतील लोकांना लग्न झाल्याचे कळायचे आता मात्र कोरोनाचे निर्बध हटवल्याने लगीनसराई धडाक्यात सुरू आहे.
एप्रिल ते जुलै या कालावधीत लग्नाचे तब्बल ४२ मुहूर्त आहेत. एप्रिल महिन्यात ११, मे मध्ये १४, जुनमध्ये १२, व जुलैमध्ये ५ मुहूर्त आहेत. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यामुळे धुमधडाक्यात लग्न होणार असल्याने बिछायत, मंडप व्यवसायिक, मंगल कार्यालये, लॉन, कॅटरर्स, इव्हेंट मॅनेजमेंट, सजावट, फुलारी, घोडेवाले,ऑर्केस्ट्रा, गायक, बेंजो, बँड पथकांना यावर्षाचा मुहूर्त लाभदायी ठरणार आहे. मागील दोन वर्षात कोरोनाचा मोठा फटका मंडप व्यावसायिक, मंगल कार्यालये, कॅटरर्स, बँड ,बेंजो तसेच याच्याशी संबंधित असणारे कारागीर, कामगार यांना बसला. गेल्या दोन वर्षात पंचवीस पन्नास लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ पार पडली असल्याने लग्नाशी संबधित असणारे सर्व व्यावसायिक प्रचंड अडचणीत आले होते. गेल्या दोन वर्षापासुन थांबलेले अर्थचक्र आता हळुहळू गती घेऊ लागले आहे. यावर्षी लग्नाचे मुहूर्त देखील चांगले आहेत. एप्रिल व मे महिन्यात साधारपणे एक दिवसा आड लग्नाचा मुहूर्त आहे. त्यामुळे लगीनघाई जोरात आहे.
प्रतिक्रिया
मागील दोन वर्षात कोविड नियमांमुळे बिछायत, मंडप व शुभकार्य संबंधित शेकडो प्रकारच्या व्यावसायिकांची आर्थिक स्थिती अत्यंत खालावली आहे. या दरम्यान शासनाने आम्हाला वाऱ्यावर सोडले कोणताही मदतीचा हात समोर केला नाही. आता सर्व निर्बंध उठल्याने सर्वांचा व्यवसाय चांगला होईल अशी अपेक्षा आहे.
धिरज संतोष बजाज, उपाध्यक्ष, तेल्हारा तालुका बिछायत, मंडप, असोसिएशन.