अकोला,दि.३: शेतकऱ्यांचा आर्थिक उत्कर्ष व्हावा यासाठी ‘विकेल ते पिकेल’, ही संकल्पना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कृषी विभागाला दिली. त्यावर अंमलबजावणी करीत अकोला येथील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा ‘आत्मा’ अंतर्गत रब्बी हंगामात प्रायोगिक तत्त्वावर ‘जवस’ पिकाची लागवड करण्यात आली. या प्रयोगाला शेतकऱ्यांनीही उत्तम प्रतिसाद देत जिल्ह्यात १६५ एकर क्षेत्रावर जवस पीक बहरले आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. कांताप्पा खोत यांनी दिली आहे.
जवस हे औषधी गुणधर्म असलेले व खनिज;जीवनसत्वेयुक्त तेलबिया पीक. जवसाचे तेल काढता येते. उच्च रक्तदाब, संधीवात, वयोमानानुसार येणारी गुडघेदुखी इ. आजारांवर उपयुक्त आहे. जवसाचा आहारात समावेश असला की, पचन शक्तीत सुधारणा होते. हिवाळ्यात शरिरात उष्णता टिकवून ठेवण्याचे काम करते. असे हे जवस पीक उत्तम आर्थिक मोबदला देणारे आहे.
जवस पीक रब्बी हंगामातील पीक असून पूर्णतः कोरडवाहू आहे. सरे पाडून पेरणी यंत्राने पेरणी केल्यास जमिनीतील वाफशावर हे पीक येते. पारंपारिक पद्धतीत बियाणे फोकून (फेकून) पेरणी करण्यात येते, मात्र कृषी विभागाने पेरणी यंत्राने पेरणी करण्याची शिफारस केली आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात बार्शी टाकळी, तेल्हारा, अकोट, पातूर, बाळापूर या पाच तालुक्यात १६५ एकर क्षेत्रावर जवस लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक शेतकऱ्याची एक एकर जमिन या प्रमाणे १६५ शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. एकरी ४ ते ५ क्विंटल पर्यंत पिकाचे उत्पन्न अपेक्षित आहे. यंदा लागवड केलेल्या हंगामात या पिकावर कोणतेही किड वा रोग असल्याचे निरीक्षणात आढळून आले नाही, असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
नोव्हेंबरच्या शेवटच्या व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात लागवड केलेल्या या पिकाची जिल्ह्यात वाढ जोमदार आहे. सध्या पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. ११० दिवसांनंतर पीक परिपक्व होऊन जवसाचे दाणे आकारात येतात. दाण्यांचा गुच्छ असतो. पीक कापणीच्या वेळी हा गुच्छ किंवा तुरा कापून मळणी यंत्रात मळणी करुन जवसाचे उत्पादन घेता येते. जवसावरील कवच काढून आतील बी सदृष्य दाणा हे जवस म्हणून प्रत्यक्ष वापरता येते. त्यापासून तेल काढता येते किंवा पूरक अन्न म्हणूनही ते वापरतात. जवस घालून अनेक पदार्थ, चटण्या आदी करुन त्याचे सेवन करता येते. सध्या बाजारात औषधी गुणधर्म असलेल्या या पिकास सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल इतका भाव आहे.
यंदा हे जवसाचे अकोला जिल्ह्यातील प्रात्यक्षीकाचे वर्ष आहे, ह्या नाविन्यपूर्ण पिकाच्या लागवडीला ज्या पद्धतीने शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे, आणि इथल्या जमिनीनेही ह्या पिकाची जोमदार वाढ दिली आहे, ते पाहता भविष्यात जवसाच्या लागवडीचे क्षेत्र वाढून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाची हमी मिळण्याची खात्री निर्माण झाली आहे.