तेल्हारा : तालुक्यातील चारही भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली असून सर्वच रस्त्यांची वाट लागलेली आहे रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे अशी भयावह परिस्थिती निर्माण झाल्यामुळे रस्त्यांचे कामे लवकर सुरू व्हावे याकरिता तेल्हारा येथील युवा पत्रकार विशाल नांदोकार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालया समोर पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे .
तालुक्यातील चारही भागात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे त्यामध्ये रस्त्यावर पडलेल्या माती मुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य व खड्ड्यांच्या साम्राज्यामुळे नागरिक हैराण झाले असून आरोग्याच्या दृष्टिकोनातून अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे या भयावह रस्त्यांमुळे आजपर्यंत अनेकांनी आपला जीव गमावला असून अनेक लहान-मोठया अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत रस्त्यावरील धुळीच्या साम्राज्यामुळे पिकांची परिस्थिती गंभीर होत चालल्यामुळे रस्त्यालगतच्या शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे या सर्व बाबींकडे शासन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्यामुळे रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्यास विलंब होत असल्यामुळे सर्वत्र संबंधित व्यवस्थेबाबत रोष व्यक्त करीत आहेत थार व दहीगांव येथिल ग्रामस्थांनी रस्त्यालगतच्या फाट्यांवर साखळी उपोषणाला सुरुवात केली असून आता ही चळवळ तेल्हारा शहरा सह ग्रामीण भागातून सुरू झाली आहे.
रस्त्यांची कामे विनाविलंब सुरू करण्याकरिता पुन्हा एकदा तेल्हारा येथील पत्रकार विशाल नांदोकार यांनी १ जानेवारी पासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तेल्हारा येथील उपविभागीय कार्यालया समोर आमरण उपोषणा सुरु केले आहे या पूर्वी विशाल नांदोकार या युवकाने दि २६ जून २०२१ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले होते त्यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आश्वासन देवून उपोशन सोडविले होते सहा महिने उलटून सुद्धा रस्त्याचे काम मार्गी लागले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विशाल नांदोकार या युवका ने १ जानेवारी २०२२ पासून बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे.
नागरिकांनचा पाठिंबा
तालुक्यातील जीवघेण्या रस्त्यांबाबत त्रस्त झालेल्या नागरिकांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व सामाजिक संघटनांनी उपोषणस्थळी भेट देऊन शासनाने रस्त्यांचे कामे लवकर सुरू करावे अशी मागणी करून विशाल नांदोकार यांनी केलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देऊन रस्त्यांबाबत शासन व्यवस्थेबद्दल रोष व्यक्त केला.