मुंबई: शाळा, प्रार्थनास्थळांपाठोपाठ चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. २२ ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करून चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याची परवानगी ठाकरे सरकारनं दिली आहे.
चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांचे प्रतिनिधी यांच्यासोबत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यानंतर चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आला. २२ ऑक्टोबरला राज्यातील चित्रपटगृह, नाट्यगृह सुरू होतील. जवळपास दीड वर्षापासून चित्रपटगृह, नाट्यगृह बंद आहेत. ती सुरू करण्यासाठी महिन्याभराचा वेळ लागेल.
बॉलिवूडसाठी मुंबई महत्त्वाची
देशातील अनेक राज्यांमध्ये चित्रपटगृह सुरू करण्यात आली आहेत. दिल्ली, लखनऊमध्ये सिनेमागृह सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील सिनेमागृह सुरू करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. बॉलिवूडला सर्वाधिक उत्पन्न मुंबईतून मिळतं. त्यामुळे ही मागणी करण्यात येत होती. अखेर आज याबद्दलचा निर्णय झाला.
यापेक्षा चांगली बातमी असूच शकत नाही- अशोक सराफ
चित्रपटगृह, नाट्यगृह बंद असल्यानं इंडस्ट्रीमधल्या सगळ्यांचीच सगळीच गणितं बिघडली होती. बॅकस्टेजला काम करणाऱ्यांची अवस्था अतिशय वाईट झाली. त्यांना आला दिवस ढकलणंदेखील अत्यंत कठीण जात होतं. आता नाट्यगृह सुरू असल्यानं त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटेल. अनेकांच्या हाताला काम मिळेल. त्यामुळे यापेक्षा चांगली बातमी असूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केली