ठाकरे सरकारवर संतापला अभिनेता वरुण धवन ; पोस्ट शेअर करत व्यक्त केली नाराजी : अभिनेता वरुण धवन वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या पोस्ट आणि व्हिडीओद्वारे चाहत्यांच्या संपर्कात असतो. मुंबईत आता करोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. नियम पाळून लोक सगळीकडे जाऊ शकतात. एवढच नाही तर ज्यांचे लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत त्यांना आता शॉपिंग मॉलमध्ये जाण्याची परवानगी आहे. मात्र या यादीत अजून चित्रपटगृहांना परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे वरूणने त्याची नाराजी व्यक्त केली आहे. त्याने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे.
वरूणने महाराष्ट्रातील चित्रपटगृह बंद ठेवण्याच्या आदेशाबद्दल त्याचे मत व्यक्त करत गुरुवारी त्याने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला होता. यात वरुणने वांद्रे इथल्या परिस्थितीचं वास्तव दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत गाड्यांची वर्दळ आणि गर्दी दिसत आहे. या व्हिडीतून सर्व काही सुरळीत सुरु असल्याचं पाहायला मिळतंय.हा व्हिडीओ त्याच्या स्टोरीवर शेअर करत त्याने लिहिले की, “सगळं काही सुरू आहे, मात्र चित्रपटगृह बंद?” याबरोबरच त्याने नाराजी व्यक्त करणार इमोजी देखील वापरला.
वरूणने शेअर केलेली ही स्टोरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटगृह बंद झाली आहेत. सगळे चित्रपट डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येत आहेत. ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीत शॉपिंग मॉल, जिम सारख्या बऱ्याच गोष्टीवरचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. इतर राज्यात ३० जुलै पासून मल्टीप्लेक्स, आणि पीव्हीआर सिनेमासाठी ज्यांचे लसीकरण झाले आहे त्यांना परवानगी दिली आहे.
कोविड-१९ प्रादुर्भाव सातत्याने कमी होत असल्याने मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, पंजाब, हरियाणा, गुजराथ सारख्या राज्यांनी चित्रपटगृह सुरू केली आहेत. मात्र महाराष्ट्रात अजून यावर निर्बंध आहे. दरम्यान अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ हा पहिला चित्रपट आहे जो लॉकडाऊन नंतर चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात आला आहे. वरूणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो ‘कूली नंबर १’या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकला होता. तसच तो ‘भेडीया’, ‘जुग जुग जियो’ अश्या अनेक चित्रपटात झळकणार आहे.