अकोला, दि. 4 (जिमाका)- अतिवृष्टी व महापुरामुळे ज्या शेत पिकांचे नुकसान झाले आहे अशा नुकसानग्रस्त क्षेत्रातील पीक विमा कंपनीने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्या, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले.
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी यांच्या दालनात जिल्हास्तरीय पीक विमा समितीची बैठक झाली. याबैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, कृषी विभागाचे अधिकारी तसेच विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दि. 11 ते 22 जुलै या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी व ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील 35 महसुल मंडळामध्ये सोयाबीन, मुग, उडीद व कापुस या पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेले आहे. अशा बाधीत मंडळामध्ये हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत प्रतिनिधीक सुचकांच्या आधारे विशिष्ट पिक व पिकांच्या गटासाठी अधिसुचित विमा क्षेत्राकरीता जिल्ह्यात कार्यरत एचडीएफसी इर्गो विमा कंपनीने नुकसान भरपाई देण्याबाबत कार्यवाही करावी. तसेच विमा कंपनीने अपेक्षीत नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत द्यावी व ही मदत अंतिम येणाऱ्या नुकसानीतुन समायोजित करण्याच्या निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिल्या.