राज्यात किमान 2 हजार कोरोना रुग्णांना म्युकर मायकोसिस तथा काळ्या बुरशीची लागण झाली असल्याची शक्यता खुद्द राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी व्यक्त केली. मंगळवारी कल्याण परिसरात दोन, तर ठाणे शहरात एका म्युकर मायकोसिस रुग्णाचा बळी गेला. कोल्हापुरातही 4 संशयित रुग्णांचे मृत्यू झाले. राज्यात या बुरशीचे किती रुग्ण आहेत, किती दगावले, किती रुग्णांनी डोळे गमावले, याची नोंद करणारी कोणतीही व्यवस्था आरोग्य खात्याकडे नाही. त्यामुळे म्युकर मायकोसिससारख्या भयंकर धोकादायक आजाराबद्दल एकूण कारभार अंदाजावरच सुरू असलेला दिसतो. ज्या पातळीवर कोरोना उपचाराची यंत्रणा राज्यभर सक्रिय झालेली आहे. अशी कोणतीही स्वतंत्र यंत्रणा काळ्या बुरशीसाठी नसल्याने हे रुग्ण आरोग्य खात्याने अक्षरशः वार्यावर सोडलेले दिसतात.
राज्यात या आजाराचे किमान 2 हजार रुग्ण असावेत, असा अंदाज टोपे यांनी इंडिया टुडे या पाक्षिकाशी बोलताना व्यक्त केला. या रुग्णांवरील उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमध्ये व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही टोपे म्हणाले. या आजारावर दिल्या जाणार्या इंजेक्शनसाठी दोन ते नऊ हजार रुपये मोेजावे लागतात. ती 21 दिवस घ्यावी लागतात. त्यामुळे अशी 1 लाख इंजेक्शन्स खरेदी करणार असल्याचे टोपे यांनी आधीच जाहीर केले आहे. शिवाय, महात्मा फुले जनआरोग्य योजनेत म्युकर मायकोसिसचे सर्व उपचार मोफत करण्याचा निर्णयदेखील राज्य सरकारने घेतलेला आहे. असे असले तरी प्रत्यक्षात या रुग्णांसाठी स्वतंत्र आरोग्य यंत्रणा अजूनही राज्यात सक्रिय झालेली नाही.
गेल्या काही दिवसांपासून म्युकर मायकोसिसवर डॉक्टरांनी सुचवलेल्या औषधांची मागणी वाढली आहे. त्यात फोटॉन, एम्टोटेरीसीन बी यासारख्या औषधांचा समावेश आहे. मागणी वाढल्यामुळे या औषधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे त्यांचा काळा बाजार होऊ शकतो, हे लक्षात घेऊन सरकारने या औषधांच्या उत्पादन आणि वितरणाबाबत निश्चित असे धोरण ठरवणे आवश्यक आहे; अन्यथा त्यांची अवस्था रेमडेसिवीरसारखी होण्यास वेळ लागणार नाही. एकूणच या आजाराकडे अत्यंत गांभीर्याने पाहून त्याच्यावर उपचार करणारी सक्षम यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे.
म्युकर मायकोसिसची लक्षणे
रक्ताच्या गुठळ्या होणे, डोळ्याखाली तीव्र वेदना होणे, नाक चोंदणे आणि अंधुक दिसणे अशी प्रमुख लक्षणे काळ्या बुरशीची आहेत.
श्वासोच्छ्वासास त्रास, रक्ताच्या उलट्या आणि मानसिक स्थिती बिघडणे अशीदेखील लक्षणे आहेत.
बुरशीजन्य आजार हे काही नवे नाहीत. मात्र, कोरोना रुग्णांवर उपचारादरम्यान वापरण्यात येणारी औषधे, उत्तेजके शरीरातील साखरेचे प्रमाण वाढवतात. त्याचा आघात रुग्णाच्या प्रतिकारकशक्तीवर होतो. प्रतिकारकशक्ती क्षीण झाल्यामुळेच काळी बुरशी हल्ला चढवते. ही बुरशी एरव्ही वातावरणात आधीपासूनच आहे. याचाच अर्थ कोरोनाचा एक परिणाम म्हणून या नव्या आजाराकडे बघावे लागते.
संसर्गजन्य नाही म्हणून?
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागांत म्युकर मायकोसिसचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तर ओडिशा, दिल्लीमध्येही या आजाराने शिरकाव केला आहे.
हा आजार संसर्गजन्य नाही. एकाचा दुसर्याला संसर्ग होत नाही. घरात एखाद्यास या काळ्या बुरशीने गाठले, तरी त्याच्यापासून अन्य सदस्यांना हा आजार होत नाही.
तीव्र मधुमेह, कोरोना उपचारांमुळे क्षीण झालेली प्रतिकारकशक्ती असे अत्यंत कमजोर झालेले रुग्णच या बुरशीचे सहज शिकार होतात.
हा आजार संसर्गजन्य नसल्यामुळेच आरोग्य यंत्रणेमध्ये या बुरशीच्या आगमनाने जो ‘रेड अॅलर्ट’ जारी व्हायला पाहिजे होता तसा तो झालेला नाही. त्यामुळेच हे रुग्ण काळ्या बुरशीशी अक्षरशः एकाकी झुंज देत आहेत.
हे कोरोनानंतरचे धक्के
मोठा भूकंप होऊन गेल्यानंतर जसे अनेक लहान-मोठे धक्के, आफ्टर शॉक्स बसतात तसेच धक्के कोरोनानंतर आपल्याला बसणार आहेत. म्युकर मायकोसिस हा असाच एक धक्का होय. अशा धक्क्यांना सामोरे जाण्याची तयारी आता सरकारला आणि आपल्याला करावी लागेल. हा फंगस जिथे संसर्ग करतो तो भाग शस्त्रक्रिया करून काढून टाकावा लागतो. याशिवाय अशा रुग्णांना अँटिफंगल इंजेक्शन्स द्यावी लागतात. ती अत्यंत महागडी आहेत. म्हणजे केवळ इंजेक्शन्सवर एका रुग्णाचा खर्च 4 ते 5 लाख येतो. याशिवाय शस्त्रक्रिया करावी लागली तर तो खर्च वेगळा.
– डॉ. ईश्वर गिलाडा, संसर्गजन्य आजार तज्ज्ञ