नवी दिल्ली : देशात करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यातच महाराष्ट्र, गुजरातसह देशातील अनेक राज्यांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमिवर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्राने रेमडेसिवीर इंजेक़्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. एएनआय या वृत्त संस्थेने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.
देशभरात कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. त्यातच लसींच्या तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच अनेक रुग्णांना आवश्यक असलेलं रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे समोर आले आहे. तर अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकाने रेमडेसीवरची निर्यात थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्या स्थानिक कंपन्या रेमडेसीवीरचं उत्पादन करतात त्यांना, त्यांच्या वेबसाईटवरती संपूर्ण साठ्याची माहिती द्यावी लागणार आहे. कोणत्या वितरकरांच्या माध्यमातून त्या पुरवठा करत आहेत, याबाबत देखील माहिती द्यावी लागणार आहे. तसेच, औषध निरीक्षक व इतर संबंधित अधिकाऱ्यांना रेमडेसीवरच्या साठ्यावर सातत्याने लक्ष द्यावे लागणार आहे आणि काळाबाजार रोखण्यासाठी काय उपाय करण्यात आले आहेत, हे देखील जाहीर करावं लागणार आहे.
देशातील करोना रुग्णांची वाढती संख्या पाहता रेमडेसिवीर इंजेक्शनच्या मागणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे रेमडेसिवीरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार देशातील औषध निर्मती कंपन्यांच्या संपर्कात आहे, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.