मुंबई – कोरोनाच्या फैलाव आणि लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात अनेक जणांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. दरम्यान, राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागात मेगाभरती निघणार असल्याने सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. या संदर्भातील माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी माहिती दिली आहे.
राज्याच्या पशुसंवर्धन विभागात सुमारे तीन हजार पदांसाठी मेगा भरती निघणार आहे. यामध्ये पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठातील जागाही भरल्या जाणार आहेत, अशी माहिती सुनील केदार यांनी दिली आहे. या भरती प्रक्रियेची माहिती काही दिवसांत प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सरकारच्या अनेक विभागातील भरती प्रक्रिया लांबणीवर पडलेल्या आहेत. मात्र आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागल्याने विविध विभागांमधील भरती प्रक्रियांना चालना मिळण्याची शक्यता आहे.