तेल्हारा : तेल्हारा तालुक्यातील वान धरणातील पाण्याबाबत अमृत योजना अकोला शासन निर्णय रद्द करून बाळापुरचा प्रस्ताव तसेच भविष्यात इतर कोणताही प्रस्ताव होऊ नये व वान धरणातील पाणी तालुक्यातील शेतीचे सिंचनासाठी आरक्षीत करावे या प्रमुख मागणीसाठी दि. 24 नोव्हेंबरला तहसील कार्यालय येथे धरणे आंदोलन करून अकोला शासन निर्णय रद्द करून बाळापुरचा प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले. अकोला-बुलढाणा-अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तेल्हारा तालुक्याचा हद्दीत वारी भैरवगड येथे वान नदीवर हनुमान सागर प्रकल्प (वान धरण) हे तेल्हारा व संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा शेतीचे सिंचनासाठी बांधण्यात आले होते.
या धरणाचा मुळ उद्देश सिंचन आणि फक्त सिंचन हाच होता. शेतकऱ्यांचे सिंचनाकरिता व पिण्याच्या पाण्याकरिता आरक्षण सोडून अमृत योजनेचे व्यतिरिक्त फक्त २० द.ल.घ.मी. पाणी धरणामध्ये शिल्लक राहते त्यामुळे धरणावरील सिंचनाच्या मुळ उद्देशाला बाधा पोहचत आहे. सध्या परिस्थितीत तेल्हारा तालुक्यातील वान धरणाच्या परिसरातील फक्त ५ ते ६ गावांना वान धरणाचे पाण्याचा पिण्यासाठी पुरवठा होत आहे त्यामुळे तालुक्यातील १०० गावांना पिण्याकरिता वानचे धरणाची आवश्यकता आहे व तसा प्रस्ताव सुद्धा प्रलंबित आहे तसेच अकोट तालुक्यातील बर्याच गावांत सुद्धा पाणी नाही.अशातच बाळापुर मधील खेड्यांकरिता पिण्याच्या पाण्याची मागणी आहे व सदर मागणी हि ज्या ठिकाणी होत आहे त्या ठिकाणचे सर्व गावे हे बाळापुर तालुक्यातील उपलब्ध धरणाच्या परिसरातील आहेत त्यामुळे वान धरणातून बाळापुर तालुक्यात १०० कि.मी. पाणी नेण्याचा जो घाट रचला जात आहे त्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे व याकरिता लागणारा करोडो रुपये खर्च हा शासनाचे तिजोरीतून जाणार आहे.
अकोला जिल्ह्यामध्ये एकूण ९ प्रकल्प त्यातील बाळापुर तालुक्यात ३ प्रकल्प असून ३ मोठ्या नद्या आहेत तरीही वान धरणाचे पाणी बाळापुर करिता मागणी असल्याने तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचनाचे पाण्यावर बाळापुर तसेच अकोला तालुक्यातील राजकारण्यांचा डोळा आहे.तेल्हारा तालुक्यामध्ये रस्ते चांगले नाहीत त्यामुळे तालुक्यात इतर उद्योगधंदे नाहीत त्यामुळे तालुक्यातील लोकांना शेतीशिवाय पर्याय नाही- त्यामुळे धरणातील पाणी सिंचनास न मिळाल्यास शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येईल भविष्यातील धोका ओळखून आज दि २४/11/२०२० मंगळवार रोजी तहसील कार्यालय तेल्हारा येथे एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व तेल्हारा तहसीलदार याचे मार्फत वानचे पाणी अकोला अमृत योजना शासन निर्णय रद्द करून बाळापूर येथील प्रस्ताव फेटाळला जावा यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले दरम्यान धरणे आंदोलन मध्ये तेल्हारा संग्रामपूर व अकोट तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांच्या धरणे आंदोलनाला विवाध पक्ष संघटना चा पाठींबा.
तेल्हारा तहसील कार्यालय येथे शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला काॅग्रेस, शिवसेना, भारीप बमस,सह युवाशक्ती संघटना, लोकजागर, विश्व वारकरी सेना,युवाक्रांती विकास मंच,शहीद भगतसिंग मंडळ, स्वा.सावरकर स्मृती समिती, सामाजिक आंदोलन संघ,नगर सेवा समिती सह काही राजकीय नेत्यांनी पाठीबा दिला आहे.