हिवरखेड (धीरज बजाज)-
राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत करावी या मागणीसाठी तेल्हारा तालुका आम आदमी पार्टीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन देण्यात आले.
पावसाळ्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली परंतु बहुतांश सोयाबीन बियाणे निकृष्ट असल्याने उगवण क्षमता अतिशय कमी होती. त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली.
दुबार तिबार पेरणी नंतर सोयाबीन, मूग, उडीद ही पिके बर्यापैकी बहरली होती. परंतु गेल्या दोन महिन्यात जोरदार वादळी पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेली पिके कापणी करण्यापूर्वीच खराब झाली.
विदर्भासह राज्यातील इतर भागातही सोयाबीनवर येलो मोजॅक नावाची कीड आल्यामुळे सोयाबीनला लागलेल्या शेंगा भरल्याच नाहीत आणि बऱ्याच ठिकाणी सोयाबीन कापणी विना नांगरणी करावी लागली ही वास्तविकता आहे.
गेल्या महिन्यात जास्त पावसामुळे विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र इत्यादी भागातील कपाशीचे बोंड सडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विदर्भातील संत्रा पिकांचे सुद्धा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्याच्या शेवटी मानवनिर्मित पूर आल्यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली आली होती, तसेच गावातील नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यांना ही पूर्णपणे मदत मिळालेली नाही. जेथे मिळाली ती फारच तुटपुंजी मदत होती. दुसरीकडे मागील दोन कर्जमाफी मध्ये अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच नाही. एकूणच राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती विदारक आहे. त्यामुळे सरकारकडून शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे. अशी आम आदमी पार्टीची भूमिका असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदन देतेवेळी राजाभाऊ देशमुख, अरुण कोरडे, मीनाताई घुरडे, राहुल देशमुख, भिकाजी कडू पाटील, यांच्यासह आम आदमी पार्टीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
वेगळा बॉक्स
आम आदमी पार्टीने शेतकऱ्यांसाठी केलेल्या प्रमुख मागण्या
राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा.
नुकसान झालेल्या पिकांसाठी दिल्ली सरकार प्रमाणे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये मदत जाहीर करावी.
कपाशीचे पंचनामे करून अहवाल सादर करावा.
सोयाबीन धान व कपाशी खरेदी साठी सरकारी यंत्रणा उभी करावी आणि एम.एस.पी. नुसार सरकारी खरेदी चालू करावी.
पूर्व विदर्भात मानवनिर्मित पुरामुळे झालेले नुकसान भरपाई कोकणात दिलेला मदती प्रमाणेच देण्यात यावी.
राज्यात जेथे जेथे फळबागांचे नुकसान झाले तेथे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी.
ज्या शेतकऱ्यांना मागच्या दोन कर्जमाफीमध्ये लाभ मिळाला नाही त्यांना कर्जमाफी देण्यात यावी.