मुंबई :
महाराष्ट्रातील मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली करण्याच्या मागणीसाठी भाजप आक्रमक झाले आहे. आज राज्यातील विविध भागांमध्ये तिव्र आंदोलन करण्यात येत आहे. मंदिर प्रवेशासाठी भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरांसमोर भाजप कार्यकर्ते मंदिर प्रवेशासाठी आक्रमक झाले होते. पण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे याठिककाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
बार उघडलेत, मग मंदिरं बंद का? असा सवाल करत भाजप नेते आज राज्यभर आंदोलन करत आहेत. राज्यातील मंदिरे खुली करावीत यासाठी भाजपने मुंबईसह विविध ठिकाणी आंदोलने केली. मुंबईत सिद्धिविनायक मंदिराबाहेर साखळी उपोषण केले. यानिमिताने राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. दुस-याबाजूला कोरोनाची परिस्थिती असताना भाजपने कोणत्याही नियमांचे पालन केलेले नाही. सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले.
मंदिरं सुरू करण्याच्या वादात आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उडी घेतलीय. राज्यात बार सुरू झाले मग मंदिरं बंद का असा सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना विचारला आहे. याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीलं आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत माझ्या हिंदुत्वाला तुमचे प्रमाणपत्र नको. मी राज्यातील जनतेचा जीव जपण्याला प्राधान्य देणार आहे. मंदिरे उघडणे म्हणजे हिंदुत्व नव्हे, असे मुख्यमंत्र्यांनी राजपालांना पत्र लिहून स्पष्ट केले आहे.