१५ ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्यदिन तसा सर्व भारतीयांचा अगदी लहान थोरांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाच्या गर्वाचा, अभिमानाचा, मान उंचविण्याचा दिवस. विषशतः शाळकरी मुलांसाठी व्यस्त आणि शिस्तीचा दिवस. किमान पंधरा दिवस अगोदर कवायतीची कसरत करत स्वातंत्रदिनाच्या दिवशी अभिमानाने ध्वजास सलामी देण्याचा दिवस. मात्र यंदाचा स्वातंत्रदिन प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांविना साजरा होणार आहे. आणि बहुतेक करून क्वचित एखादा स्वातंत्र्यदिन वगळता हे पहिल्यांदाच घडत आहे. कोरोना संकटामुळे जगभर हाहाकार माजला आहे. याचा सर्वाधिक फटका बसला तो शिक्षण क्षेत्राला. ऑगस्ट संपत आलेला असला तरी अजूनही शाळा सुरू होण्याची कोणतेही चिन्ह दिसत नाही. यामुळे ऑनलाईन शिक्षण कितीही गाजावाजा करत सुरू झालेले असले तरी काही अपवाद वगळता ग्रामीण, निमशहरी भागातील विद्यार्थ्यांच्या नशिबी निराशाच आली आहे. प्रभावी नेटवर्क चा अभाव, अत्याधुनिक स्मार्टफोनची कमतरता, अशिक्षित पालक, इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान वापरण्याविषयी अज्ञान यामुळे वरील ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाचा बोजवारा उडाला आहे. त्यात स्वातंत्रदिनाचा आनंद देखील विद्यार्थ्यांना या वर्षी घेता येणार नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे. गाव खेडे, कॉलनी, गल्लीतून शिस्तीत घोषणा देत जाणारी शाळकरी विद्यार्थ्यांची प्रभातफेरी, कवायतीचे सूर, ढोल चे घुमणारे लयबद्ध स्वर या वर्षी तरी ऐकायला मिळणार नाही. अशी परीस्थिती कोरोनामुळे पाहायला मिळणार आहे.