हिवरखेड (प्रतिनिधी)- बहुप्रतिक्षित अकोला- खंडवा- इंदौर मीटरगेज मार्गाचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर पैकी अकोट ते अकोला मार्गाचे काम नुकतेच पूर्ण झाले. परंतु महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशला जोडणाऱ्या सर्वात महत्वाच्या अकोट- हिवरखेड- आमलाखुर्द या रेल्वे मार्गाचे काम रखडल्याने लाखो प्रवाशांचा हिरमोड झाला आहे. हा मार्ग मेळघाट मधूनच न्यावा किंवा मेळघाटच्या बाहेरून पर्यायी मार्ग निवडून बुलढाणा जिल्ह्यातून न्यावा या मागणीला धरून दोन गट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. याला आता केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार असे राजकीय स्वरूप आल्याचेही बोलल्या जात आहे. ह्या आत बाहेरच्या ओढातानीत सामान्य रेल्वे प्रवासी पुरते भरडले जात असून मागील साडे तीन वर्षांपासून मीटर गेज रेल्वे सुद्धा बंद झाल्याने महाराष्ट्र मध्यप्रदेश रेल्वे संपर्क तुटलेला असल्याने प्रवाशांची स्थिती मात्र “तेल गेले, तूप गेले हाती धुपाटणे आले” अशी झाली आहे. प्रवाशांना हजारो रूपयांचा भुर्दंड पडत असून व्यापाऱ्यांचे लाखो करोडो रुपयांचे नुकसान होत आहे. जोपर्यंत आत बाहेरचा निर्णय होत नाही. तोपर्यंत अकोट ते मध्यप्रदेश अशी मीटरगेज रेल्वे का सुरू ठेवली नाही? असा संतप्त सवाल प्रवाशी विचारत आहेत.
प्रतिक्रिया:-
आपसी द्वंद आणि ओढताढ थांबवुन आतला किंवा बाहेरचा कोणताही मार्ग निवडा पण काम तात्काळ सुरु करून हा प्रकल्प पूर्ण करावा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि नितीन गडकरी यांच्याशी मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा केल्यास ह्या मार्गावर तात्काळ तोडगा निघू शकतो.
धिरज बजाज, सामाजिक कार्यकर्ता, हिवरखेड
वेगळा बॉक्स 1
समर्थक आणि तर्क
मार्ग मेळघाट मधूनच नेण्यासाठी भाजपा प्रणित केंद्र सरकार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, संजय धोत्रे, दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकारी, खासदार नवनीत राणा, आ. राजकुमार पटेल, अमरावती जिल्यातील आदिवासी लोकप्रतिनिधी, यांच्यासह अनेक मान्यवर इच्छुक असल्याचे दिसते.
तर्क
सर्वात जुना आणि जवळचा मार्ग आहे.
आधीपासूनच मार्ग अस्तित्वात असल्याने वनकायद्याचा अडसर नसावा.
धुळघाट येथील ४ चा आकडा विशेष आकर्षण आहे.
काम लवकर पूर्ण होईल.
काम कमी खर्चात पूर्ण होईल.
भूमी अधिग्रहणाची आवश्यकता राहणार नाही.
वेळ, श्रम पैसा वाचेल.
आदिवासी बांधवांच्या उन्नतीचा मार्ग आहे.
आतापर्यंत वन्यजीव हानी झाली नाही.
वेगळा बॉक्स 2
पर्यायी मार्गाचे समर्थक व तर्क
सुप्रीम कोर्टाची सेंट्रल इम्पॉवर्ड कमिटी CEC, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी प्रणित महाआघाडीचे महाराष्ट्र सरकार, वनविभाग, नॅशनल बोर्ड फॉर वाईल्ड लाईफ NBWL, नॅशनल टायगर कंझरवेशन अथोरिटी NTCA, वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया WII, पर्यावरण व वन्यजीव प्रेमी, बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव, माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, विधिज्ञ मनीष जेसवानी, जयंत वडतकर, निसर्ग कट्टा, अमोल सावंत, स्वप्नील देशमुख, श्याम आकोटकर, हिवरखेडची ग्रामसभा, अनेक सामाजिक कार्यकर्ते, बुलढाणा जिल्ह्यातील नागरिक यांच्यासह अनेक संस्था मेळघाट ऐवजी मार्ग बाहेरून न्यावा अशी पक्षधर असल्याचे दिसते.
तर्क
मेळघाटातील वाघांचे अधिवास सुरक्षित राहील
वन्यजीव व पर्यावरणाचे नुकसान होणार नाही.
जैव विविधता, व जंगलांचे संरक्षण व संवर्धनात अडचण येणार नाही.
पर्यायी मार्गाने 2 लाख प्रवाश्यांना फायदा
तेल्हारा, संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यांसाठी वरदान ठरेल.
विकासाला चालना मिळून लाखो लोकांचे जीवनमान सुधारेल.
असंख्य रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
रेल्वे द्रुतगतीने धावेल.
पर्यायी मार्गासाठी राज्यसरकार 700 कोटी देण्यास तयार असल्याची चर्चा.