अकोला- नुकतेच दहावीचे निकाल लागले असून अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे केंद्रीय पद्धतीने ऑनलाइन स्वरूपात राबवावी. परंतु या प्रवेश प्रक्रियेत मोबाईल वरून प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी होता यावे, यासाठी विशेष तांत्रिक उपाययोजना करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आले.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन अर्ज भरून राबविली जाते. याहीवर्षी ही प्रक्रिया ऑनलाइन केंद्रीय पद्धतीनेच राबविल्या जावी, परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी नियोजित केलेल्या सेंटरवर विद्यार्थी व पालकांची गर्दी होऊन त्यामुळे सोशल डिस्टंसिंग च्या नियमांचा भंग होऊन विद्यार्थी व पालकांना कोरोणाचा धोका निर्माण होऊ शकतो. ऑफलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविली गेली तरीही हाच कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो. म्हणूनच अकरावीची प्रवेश प्रक्रिया दरवर्षीप्रमाणे ऑनलाइन पद्धतीने व्हावी.परंतु या ऑनलाइन पद्धतीत थोडा बदल करून ही ऑनलाइन प्रक्रिया विद्यार्थ्यांना आपल्या घरी बसून मोबाईल द्वारे पूर्ण करता यावी.यासाठी तांत्रिक नियोजन करण्यात यावे.त्यासाठी काही मोबाईल लिंक किंवा इतर तांत्रिक उपाययोजना करण्यात याव्यात.जेणेकरून विद्यार्थी व पालकांना कोरोनापासून धोकाही निर्माण होणार नाही आणि एकही विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहणार नाही.
याबाबत प्रवेश प्रक्रिया प्रारंभ होण्यापूर्वी लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा व कोणत्याही परिस्थितीत प्रवेश प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने राबविल्या जाऊ नये,अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे जिल्हाध्यक्ष संग्रामभैय्या गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. उपशिक्षणाधिकारी श्री अवचार साहेब यांनी निवेदन स्वीकारून राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून लवकरात लवकर उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस परीमल लहाने, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे करण दौंड,अनता पाचबोले,बाळासाहेब तायडे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख मोहन शेळके यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.