मुंबई : आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये राज्याच्या अंतर्गत इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी प्रवासासाठी राज्यसरकारने ‘ई-पास’ची सुविधा उपलब्ध केली होती. मात्र, आता केंद्रसरकारनेही एका राज्यातून दुसर्या राज्यात जाण्यासाठी ‘ई-पास’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
अद्यापी देशभरात ३१ मे पर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केला आहे. मात्र, या चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र सरकारने काही सवलतीही दिल्या आहेत. त्याअंतर्गत लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या राज्यात प्रवास करण्यासाठी अर्ज करता येणार आहे. केंद्र सरकारने त्यासाठी एक नवीन वेबसाइट तयार केली आहे.
http://serviceonline.gov.in/epass/ ही वेबसाईट राष्ट्रीय माहिती केंद्राद्वारे विकसित करण्यात आली आहे. या वेबसाईटवर १७ राज्यांमध्ये प्रवास करण्यासाठी ई-पास मिळवण्यासाठी अर्ज करता येणार आहे. लॉकडाऊनमध्ये मिळणारा ई-पास हा विशिष्ट श्रेणींमध्येच मिळणार आहे. या श्रेणींमध्ये विद्यार्थी, आवश्यक सेवा क्षेत्रातील कर्मचारी, पर्यटक, यात्रेकरू, आपत्कालीन आणि वैद्यकीय कारणासाठी प्रवास तसेच विवाह यांचा समावेश आहे.
वेबसाईटवरील माहितीनुसार, एखादी व्यक्ती किंवा ग्रुप या सेवेचा वापर करून प्रवासी पाससाठी अर्ज करू शकणार आहे. ई-पाससाठी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रांच्या स्कॅन प्रतीदेखील सादर कराव्या लागतील. याशिवाय ओटीपी पडताळणीसाठी एक सक्रिय मोबाइल नंबर देखील आवश्यक आहे