अकोला- जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा पुरेसा असून लोकांना गरजेनुसार सर्व उपलब्धता करुन दिली जाईल. त्यासाठी व्यापाऱ्यांना माल वाहतुक, उपलब्धता याबाबत काहीही अडचण असेल तर त्या सोडविण्यासाठी प्रशासन मदत करेल, तथापि कोणत्याही प्रकारची साठेबाजी व दरवाढ झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई होईल,असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.
लॉक डाऊन कालावधीत जिल्ह्यात जीवनावश्यक वस्तूंच्या उपलब्धता व त्यांच्या मागणी व पुरवठ्याचे प्रमाण त्याअनुषंगाने करावयाच्या उपाययोजना याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात यावेळी अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, निवासू उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजेश खवले, प्रांताधिकारी निलेश अपार,रोहयो उपजिल्हाधिकारी बाबासाहेब गाढवे, जिल्हा पुरवठा अधिकारी बी.एस. काळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मोहन वाघ व अन्य विभागप्रमुख तसेच किरणामाल विक्रेता संघटना, धान्य व्यापारी असोसिएशन, दालमिल असोसिएशन, केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशन, पेट्रोल पंप डिलर्स असोसिएशन, गॅस एजन्सी चालक आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी पापळकर यांनी जिल्ह्यात गहू, तांदूळ, साखर, तेल, मीठ, मसाले, डाळी यासारख्या स्वयंपाकासाठी व दैनंदिन जेवणासाठी आवश्यक वस्तूंच्या उपलब्धतेच्या परिस्थितीबाबत जाणून घेतले. त्याचप्रमाणे भाजीपाला, कांडे, बटाटे व बिस्कीटस तत्सम पॅकेज्ड खाद्यपदार्थ आदींच्या उपलब्धतेची माहिती घेतली. हामाल जिल्ह्यात येण्यात, तसेच माल वाहतुक, मालाची चढ उतार करण्यास मजूरांची उपलब्धता तसेच माल जर कुणी स्टॉक करुन ठेवत असेल तर त्याबद्दल माहिती घेतली. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्ह्यात कोणत्याही आवश्यक वस्तूंची केवळ वाहतुक करता येत नाही वा उपलब्धता नाही म्हणून टंचाई निर्माण होणार असेल आणि त्याचा फायदा घेऊन कोणी दरवाढ करणार असेल तर प्रशासन असले प्रकार खपवून घेणार नाही.
त्यामुळे व्यापाऱ्यांनी मालाच्या उपलब्धतेबाबत येणाऱ्या सर्व अडचणी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या.जिल्ह्यात ३८०० रिटेल तर ११४० होलसेल किराणा मालाची दुकाने असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्ह्यात आवश्यक औषधी, इन्शुलिन सारखी औषधे, बेबी फुड इ.च्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. जिल्ह्यात ११९७ रिटेल तर ५०५ होलसेल मेडीकल दुकाने असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच मास्क उपलब्धता,सॅनिटायझर उपलब्धता, याबाबतही संबंधितांकडून माहिती घेतली असून परप्रांतातून येणाऱ्या मालाविषयीही जिल्हा प्रशासनास माहिती दिली तर संभाव्य अडचण दूर केली जाईल असा विश्वास त्यांनी उपस्थित व्यावसायिकांना दिला. जिल्ह्यातील दालमिल चालकांना कच्चा माल म्हणून लागणारे कडधान्य उपलब्ध व्हावे व डाळीचे उत्पादन सुरु रहावे असे निर्देशही त्यांनी दिले. त्यादृष्टीने कृषि उत्पन्न बाजार समित्यांनी बाजार समितीत गर्दी होणार नाही याचे नियोजन करुन शेतकऱ्यांचा माल बाजारात पाचारण करुन तो उद्योजकांना कच्चा माल म्हणून उपलब्ध करता येईल असे निर्देशही दिले. या उयोजकांनी किमान आवश्यक कामगार बोलावून आपले कामकाज करावे व कोठेही दोन व्यक्तिंमध्ये किमान समान अंतर पाळले जाईल याची खबरदारी घ्यावी असे निर्देश दिले.