विदर्भ दर्शन – बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील जयपूर हे गाव हिंदू – मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. या गावात मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत, अगदी भिंतीला भिंत लागून आहेत, तरीही आजवर इथे कधी सामाजिक दंगल किंवा धार्मिक तनाव निर्माण झाला नाही. सर्व हिंदू आणि मुस्लिम मिळून मिसळून राहतात.
मोताळा तालुक्यापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या जयपूर गावात हनुमान मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत. एकीकडे मशीदीत अजान – नमाज अदा केली जाते तर दूसरीकडे मंदिरात घंटांच्या नादात बजरंग बलीचा जयघोष चालू असतो. भक्तीचा मार्ग जरी वेगवेगळा असला तरी सर्वांची श्रद्धा एक आहे.
मंदिर आणि मशीद जवळ एक वटा बांधलेला आहे, जिथे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माचे लोक एकत्र बसून विचारांची देवाणघेवाण करतात. हिंदू आणि मुस्लिम एकमेकांच्या लग्न कार्यात सहभागी होतात. दसरा – दिवाळीला मुस्लिम लोक हिंदूना आलिंगन देऊन शुभेच्छा देतात, हिंदू लोक त्यांना फराळाला घरी नेतात. याचप्रमाणे ईद साजरी केली जाते. हिंदू बांधव मुस्लिम बांधवांना ईद मुबारक देतात, मुस्लिम बांधव ही हिंदूना शिरखुर्म्यासाठी आमंत्रित करतात. सर्व मिळून सण उत्सव साजरे करतात आणि एकमेकांच्या सुख दुखात सहभागी होतात.
ज्यावेळी देशात हिंदू – मुस्लिम आणि मंदिर – मशीद यावरुन दंगल आणि धार्मिक तनाव निर्माण होतो त्यावेळी जयपूर गाव आपली एकता आणि अखंडता टिकवून असते. समाजातील काही विकृत लोक दोन गटात फूट पाडण्याचा प्रयत्न करतात त्यांनी जयपूर गावाकडून शिकवण घ्यावी.
ज्याप्रमाणे जयपूर गावाने हिंदू मुस्लिम एकता आणि धार्मिक सद्भावना टिकवून ठेवली आहे, त्याचप्रमाणे संपूर्ण देशात सामाजिक एकता आणि प्रेम राखून ठेवण्याची गरज आज देशाला आहे.