अकोला, दि. 18- मागील काही महिन्यापासून जात वैध्यता पडताळणीचे सुमारे 2 हजार प्रकरणे प्रलंबित आहेत. यातील काही प्रकरणे त्रृटया अभावी प्रलंबित आहेत. काही प्रकरणे अधिका-यांच्या स्वाक्षरीसाठी प्रलंबित आहे. ही बाब अत्यंत गंभिर असल्याने जात वैधता पडताळणीचे प्रलंबित प्रकरणे त्वरीत निकाली काढून मार्गी लावावी असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी यांच्या दालनात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राकेश कलासागर, मनपा आयुक्त जितेंद्र वाघ, मुख्यकार्यकारी अधिकारी कैलास पगारे, जात वैध्यता पडताळणी समितीचे अध्यक्ष इंद्रसेन तिटकारे, जिल्हा संशोधन अधिकारी श्री. कदम व समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सध्या 12 वी परीक्षेचा निकाल लागलेला आहे. 12 वी उत्तीण झालेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय किंवा अभियांत्रिकी शाखेत प्रवेशासाठी जात वैध्यता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. हा विद्यार्थ्यांचा जिव्हाळयाचा प्रश्न असल्यामुळे सदर प्रश्न त्वरीत मार्गी लागावा यासाठी पालकमंत्री यांच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय यांनी तहसिलदार संतोष शिंदे यांची नियुक्ती केली आहे. आज श्री. शिंदे सुमारे 1 हजार 23 प्रकरणे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्या स्वाक्षरीसाठी वाशिम येथे घेवून गेले आहेत. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री. वाट त्वरीत स्वाक्षरी करुन संबंधित प्रकरणे मार्गी लावणार आहेत तशा सुचना पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी संबंधीत अधिका-यांना दिल्या आहेत.
यामुळे विद्यार्थ्याचा जात पडताळणी प्रमाणपत्र प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून येत्या एक दोन दिवसात विद्यार्थ्याना मिळणार आहे.
——–