अकोला,दि.4 : राज्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग होऊन उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन व राज्यांतर्गत उत्पादकता वाढीला चालना देण्यासाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगामासाठी अकोला जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी केले आहे.
कृषी विभागामार्फत खरीप हंगाम सन २०२४ मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल या ११ पिकांसाठी पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक वैशिष्ट्य :-
- पीकस्पर्धेसाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख मूग व उडीद पिकासाठी ३१ जुलै तसेच भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सुर्यफूल या पिकांसाठी ३१ ऑगस्ट आहे.
- स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र सर्वसाधारण गटासाठी रक्कम रु.३०० व आदिवासी गटासाठी रक्कम रु. १५० राहील.
- स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल.
- पीक स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याकरता स्पर्धकास स्वतःच्या शेतावर स्पर्धेकरिता सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या पिकाची भात पिकाच्या बाबतीत किमान २० आर व इतर पिकांच्या बाबतीत किमान ४० आर (१ एकर) क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
- पीक स्पर्धा तालुकास्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी तालुकास्तरावरील पिकस्पर्धेमध्ये सहभाग घेऊन शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरून राज्य, जिल्हा व तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
अर्ज कोठे करावा व अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे :-
- विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
- ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
- ७/१२, ८-अ चा उतारा
- जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास)
- पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७/१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
- बँक खाते चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
पिकस्पर्धा बक्षिसाचे स्वरूप :-
सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी पीक निहाय राज्य पातळी प्रथम क्रमांक ५०००० रुपये, द्वितीय क्रमांक ४०००० रुपये, तृतीय क्रमांक ३००००, जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक १०००० रुपये, द्वितीय क्रमांक ७००० रुपये, तृतीय क्रमांक ५०००, व तालुका पातळीवरील प्रथम क्रमांक ५००० रुपये, द्वितीय क्रमांक ३००० रुपये, तृतीय क्रमांक २००० आहे.
या योजनेबाबत अधिक माहितीसाठी कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य, संकेतस्थळ-www.krishi.maharashtra.gov.in किंवा संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.