नवी दिल्ली : सध्या देशात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. भाजीपाल्यापासून ते अन्नधान्यापर्यंत आणि खाद्य तेलापासून (Edible oil rates) ते पेट्रोल, डिझेलपर्यंत सर्वच गोष्टींच्या दरात मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी आता केंद्र सरकारकडून (Central Government) काही महत्त्वपूर्ण पाऊले उचलण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपू्र्वीच पेट्रोल, डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात करण्यात आली. अबकारी कर कमी केल्याने पेट्रोल प्रति लिटर साडेनऊ रुपयांनी तर डिझेल सात रुपयांनी स्वस्त झाले. आता पेट्रोल, डिझेलनंतर केंद्रांने आपला मोर्चा खाद्य तेलाकडे वळवला आहे. खाद्य तेलाच्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने पाम तेलाचा आधारभूत आयात दर कमी केला आहे. तर दुसरीकडे सोयाबीन तेल आणि चांदीच्या आयात किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. याबाबत केंद्रांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले आहे. पाम तेलाच्या आधारभूत आयात किमतीमध्ये कपात करण्यात आल्याने येत्या काळात पाम तेल स्वस्त होऊ शकते, तर सोयाबीन तेल तसेच सोने-चांदी महाग होण्याची शक्यता आहे.
खाद्य तेलाच्या दरावर युद्धाचा परिणाम
सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे दोन्ही देश खाद्यतेलाचे प्रमुख निर्यातदार देश आहेत. रशिया आणि युक्रेनकडून आपण मोठ्याप्रमाणात सूर्यफुलाच्या तेलाची आयात करतो. मात्र सध्या युद्ध सुरू असल्याने तेलाचा पुरवठा ठप्प आहे. एकीकडे इंडोनेशियाने घातलेल्या निर्यात बंदीमुळे पाम तेलाचा तुटवडा तर दुसरीकडे युक्रेनमधून होणारी सूर्यफुलाच्या तेलाची आवक बंद असल्याने खाद्य तेलाची आवक घटली. मात्र आता इंडोनेशियाने निर्यातीवरील निर्बंध उठवल्याने भारताला काहीसा दिलासा मिळाला आहे.