अकोला : जिल्ह्यातील कोविड संसर्गाची स्थिती पाहता येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात २०० खाटांची सोय असणारे कोविड हेल्थ सेंटर सज्ज करण्यात आले आहे. राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज या कोविड हेल्थ सेंटरला भेट देऊन पाहणी केली.
जिल्ह्यात वाढती रुग्ण संख्या पाहता कोविड रुग्णांच्या उपचारासाठी पुरक व्यवस्था करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी उपलब्ध करुन देण्यात आहे. त्याअंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात दीक्षांत सभागृहात २०० खाटांचे नियोजन असलेले डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर ऑक्सिजन सुविधेसह सुरु करण्यात येत आहे. सद्यस्थितीत येथे १०० खाटांची सुविधा करण्यात आली आहे. आवश्यकता भासल्यास ही खाटांची संख्या वाढविता येणार आहे, अशी माहिती यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी दिली. पालकमंत्री ना. कडू यांनी आज याठिकाणी भेट दिली. या प्रसंगी कुलगुरु डॉ. विलास भाले, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त नीमा अरोरा, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, सदाशिव शेलार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते.
हे सेंटर येत्या सोमवार पासून कार्यान्वित होणार असून त्या दृष्टीने करण्यात आलेल्या सज्जतेचा पालकमंत्री ना. कडू यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला.
हे पण वाचा : पालकमंत्र्यांच्या हस्ते ‘रिक्त बेड माहिती’वेब पोर्टल’ व ‘जेनरीक आर्क’ ॲप सेवेत रुजू
जिल्हा परिषदेच्या कोविड सेंटरचीही पाहणी
तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषदेमार्फत जिल्हा परिषद कर्मचारी कल्याण भवन सभागृहात सुरु केलेल्या कोविड सेंटरचीही पाहणी केली.
कन्टेनमेंट झोनची पाहणी
कोविड बाधीत रुग्णांच्या संख्या अधिक असणाऱ्या भागास कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले जाते. अशा उमरी येथील भागात आज पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी एका पॉझिटीव्ह रुग्ण असलेल्या घराच्या बाहेरुन घरातील व्यक्तिंशी संवाद साधून चर्चा केली. त्यांना जाणवणाऱ्या अडचणी, उपचार सुविधांबाबत विचारपूस केली. तसेच ज्या घरात पॉझिटीव्ह रुग्ण आहेत अशा कुटुंबांना अन्न धान्य मोफत व घरपोच पोहोचविण्याबाबत व्यवस्था प्रशासनाने करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.