बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अमिताभ बच्चन यांनी यासंबंधी ट्वीट करून माहिती दिली. ऋषी कपूर यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना मुंबईतील सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऋषी कपूर यांना बरं वाटत नव्हतं. त्यांना त्रास जाणवत होता. त्यामुळे बुधवारी सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती ऋषी कपूर यांचे बंधू रणधीर कपूर यांनी दिली होती.
कपूर कुटुंबियांकडून जारी करण्यात आलेल्या अहवालात गुरुवारी सकाळी ८.४५ मिनिटांनी ऋषी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमिया आजाराशी लढत होते. गेल्या वर्षी भारतात परतल्यानंतर ते फार आनंदी होते आणि त्यांना प्रत्येकाला भेटायची इच्छा होती. पण हा आजार त्याच्यापासून दूर गेला नाही.
दरम्यान, कॅन्सरवरील उपचारासाठी ऋषी कपूर अमेरिकेत गेले होते. तिथे वर्षभर ते होते. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात ते भारतात परतले. फेब्रुवारी महिन्यात संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती चांगली होती. मात्र बुधवारी प्रकृती पुन्हा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले आहे.
ऋषी यांना काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील इस्पितळात भरती केलं होतं. तेव्हाही त्यांना श्वसनाचा त्रास झाला होता. यानंतर मुंबईत आल्यावर वायरल फीवरमुळे त्यांना इस्पितळात काही दिवसांसाठी भरती करावं लागलं होतं. ऋषी त्यांच्या सिनेमांप्रमाणेच निर्भीड प्रतिक्रियेसाठीही ओळखले जायचे. सामाजिक स्थितीवर ते अनेकदा भाष्य करायचे. मात्र २ एप्रिलनंतर त्यांनी एकही ट्वीट केलं नव्हतं.
२९ एप्रिलला सिनेसृष्टीने अभिनेता इरफान खानला गमवलं तर त्याच्या एक दिवसानंतर ३० एप्रिलला ऋषी यांनी जगाचा निरोप घेतला. सिनेसृष्टीचं हे नुकसान कधीही न भरून येण्यासारखं आहे.