तेल्हारा (प्रतिनिधी) : – शहराच्या मध्यवर्ती भागातील टाऊन हॉल परिसर सध्या अवैद्य धंद्यांचे केंद्र बनल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भरदिवसा दारू अड्डे, गांज्याची विक्री तसेच संशयास्पद हालचाली सुरू असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे. सार्वजनिक मालमत्ता असलेल्या या ठिकाणी बेकायदेशीर कृत्ये उघडपणे सुरू असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टाऊन हॉलच्या शेजारीच असलेल्या क्रीडा संकुलात दररोज मोठ्या संख्येने युवक-युवती सरावासाठी येत असतात. क्रीडांगणात घाम गाळणाऱ्या तरुणाईसमोर काही अंतरावरच अवैध दारू व नशेच्या पदार्थांची देवाणघेवाण सुरू असल्याचे चित्र संतापजनक आहे. पालकवर्गाने याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली असून, “खेळाच्या मैदानावर येणाऱ्या मुलांच्या भवितव्याशी हा थेट खेळ आहे,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.
यापूर्वी सामाजिक कार्यकर्ते विशाल नांदोकार यांनी टाऊन हॉलमध्ये विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याची मागणी केली होती. शहरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शांत व सुरक्षित अभ्यासाची जागा उपलब्ध व्हावी, हा उद्देश होता. मात्र, त्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष झाल्याने आज तीच इमारत अवैद्य कृत्यांचे आश्रयस्थान ठरत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मते, सायंकाळी आणि रात्री उशिरापर्यंत येथे संशयास्पद गर्दी वाढते. काही वेळा किरकोळ वाद, आरडाओरड आणि भांडणेही होत असल्याचे सांगितले जाते. परिसरातील व्यावसायिक व रहिवासी यांना भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. “आम्ही अनेकदा तोंडी तक्रार केली, पण ठोस कारवाई दिसली नाही,” असा आरोपही नागरिकांकडून करण्यात आला आहे.
नगर पालिका व स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे सार्वजनिक मालमत्ता गुन्हेगारी प्रवृत्तींना खतपाणी घालत असल्याची भावना शहरात पसरली आहे. जर वेळेत कडक पावले उचलली नाहीत, तर परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. क्रीडा संकुल, शैक्षणिक वातावरण आणि सभोवतालचा परिसर सुरक्षित ठेवणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे, असे मत ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केले. दरम्यान, शहरातील विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. टाऊन हॉल परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवून अवैद्य धंद्यांवर कारवाई करावी, सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि इमारतीचा विधायक वापर—अभ्यासिका, वाचनालय किंवा युवकांसाठी उपयुक्त उपक्रम यासाठी निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.
आता प्रश्न एकच—प्रशासन जागे होणार का?
टाऊन हॉल ‘अवैद्य धंद्यांचा मॉल’ बनण्याआधीच कठोर कारवाई करून शहराची प्रतिमा व तरुणाईचे भविष्य वाचवणे आवश्यक असल्याचे मत सर्वत्र व्यक्त होत आहे.











