तेल्हारा (प्रतीनिधी): – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आमदार प्रकाश भारसाकळे यांनी उठसुठ भूमिपूजन व उद्घाटनाचा सपाटा लावला आहे. तेल्हारा तालुक्यातील अकोली रूपराव येथील गायरान शेतशिवार गट क्रमांक 41 व 42 हा भूखंड मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत प्रकल्पासाठी तत्कालीन सरपंच संतोषी निखाडे यांच्या कारकिर्दीत ग्रामपंचायतने दिली मात्र विद्यमान आमदार प्रकाश भारसाकळे यांनी ग्रामस्थांना विश्वासात न घेता बेमालुमपणे दिनांक 28 सप्टेंबर रोजी तडकाफडकी भूमिपूजन उरकले, एवढेच नव्हे तर तेथे उभारण्यात आलेल्या फलकावर अकोली रूपराव नावाचा कुठेच उल्लेख न केल्याने व बेलखेड गावाचा उल्लेख केल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पसरला आहे. सदरहू प्रकल्प अकोली रूपराव गावापुरता मर्यादित असावा अन्यथा प्रकल्प होऊ देणार नाही. असा इशारा माजी सरपंच संतोषी निकाडे यांनी तेल्हारा येथे शासकीय विश्रामगृहात सोमवारी 30 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेत दिला.
आमदारांनी संबंधित भूमिपूजनाच्या फलकावर अकोली रूपराव या नावाचे स्टिकर उशिराने लावून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला, जर प्रकल्पासाठी जागा अकोली रूपरावची तर फलकावर बेलखेडचा नामोलेख का? गायरान जमिनीची मोजणी व सीमा निश्चिती रस्ते निश्चिती न करता कामाची सुरुवात कशी केली, याबाबत ग्रामस्थांसह संतोषी निकाडे यांनी पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रकल्पासाठी जमीन आमची तर लाभही आम्हाला मिळायला हवा. ही मागणी घेऊन शासन स्तरावर न्याय मागू तसे न झाल्यास कुठल्याही क्षणी प्रकल्प बंद पाडू असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला आहे पत्रकार परिषदेला संतोषी निकाडे अशोक दारोकार, यांच्यासह राजपाल खिराडे, राजेश तायडे, राहुल आठवले, वैभव तायडे ,विशाल बोदडे, गुणवंता तायडे, आकाश तायडे, प्रशांत बोदडे, गोपाल बोदडे, सुधाकर दांडगे, रोशन तायडे, अंबादास इंगळे, सचिन पवार, आदींची उपस्थिती होती.