पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल (दि.७) मंत्रीमंडळ बैठक पार पडली. या केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये केंद्र सरकारने पंतप्रधान उज्ज्वला योजनेतर्गंत मिळणाऱ्या LPG अनुदान योजनेला एक वर्ष मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकार उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना एक वर्षात १२ सिलिंडरसाठी प्रत्येक सिलिंडरसाठी ३०० रुपये अनुदान देते. ऑक्टोबर २०२३ मध्ये अनुदानाची रक्कम प्रति सिलिंडर १०० रुपयांवरून ३०० रुपये केली होती. दरम्यान काल झालेल्या बैठकीत सरकारने उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी ₹ 300 एलपीजी सबसिडी 2025 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी घोषणा केली की मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना 300 रुपये अनुदान चालू ठेवण्यास मान्यता दिली आहे. यासाठी एकूण 12,000 कोटी रुपये खर्च येईल, असे मत त्यांनी पत्रकार परिषेदेत स्पष्ट केले आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्क्यांनी वाढ करण्याच्या निर्णयालाही मंजुरी दिली. या वाढीनंतर, महागाई भत्ता ५० टक्क्यांवर गेला आहे. या विषयी बोलताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले होते की, पुढील तीन वर्षांमध्ये अतिरिक्त एलपीजी कनेक्शन प्रदान केले जातील. तसेच १,६५० कोटी रुपयांचा आर्थिक भार होईल, असे मतदेखील केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे.
PM Ujjwala Yojana : काय आहे योजना?
उज्ज्वला योजनेंतर्गत लाभार्थ्यांना मोफत गॅस सिलिंडर आणि गॅस शेगडी दिली जाते. योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाते. आतापर्यंत देशात ९.६ कोटींहून अधिक कनेक्शन देण्यात आले आहेत. ऑगस्टमध्ये, मंत्रिमंडळाने योजनेत आणखी ७५ लाख लाभार्थी जोडण्यास मंजुरी दिली होती.