अकोला दि. 27 : ज्या शेतकऱ्यांचे पीक नुकसान झाले अशा पीक विमाधारक शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत पीक विमा कार्यालय किंवा पिक विमा कार्यालयाच्या टोल फ्री क्रमांक वर माहिती देत आपल्या नुकसानाची नोंद करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.
बिगरमोसमी पावसाने जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली व पंचनामे करण्याचे आदेश दिले. पीक विमाधारक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्यास पूर्वसूचना नुकसान घटना घडल्यापासून 72 तासांचे आत देणे आवश्यक असते. बिगर मोसमी पाऊस, वादळी वारा व गारपीटीमुळे पीक नुकसान झाले असल्यास पीक विमा योजनेअंतर्गत सहभागी शेतकरी बांधवांनी पूर्वसूचनेची नोंद करावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी शंकर किरवे म्हणाले की, पूर्वसूचना देताना गहू, हरभरा, रब्बी कांदा नुकसान असल्यास बिगर मोसमी पाऊस, गारपीट, चक्रीय पाऊस यापैकी ज्या कारणामुळे पीक नुकसान झालेले आहे तेच कारण नमूद करावे. गहू, रब्बी कांदा पिकास स्टॅडिंग क्रॉप (उभे पीक) असे नमूद करावे. हरभरा – काढणी पश्चात नुकसान व क्रॉप कंडिशन कट अँड स्प्रेड असे नमूद करावे. पिकाचे नुकसान, टक्केवारी व इतर आवश्यक माहिती परिपूर्ण सादर करूनच पूर्वसूचना देण्यात यावी.
पूर्वसूचना देण्यासाठी एचडीएफशी ॲग्रो विमा कंपनीचा टोल फ्री क्रमांक 18002660700 उपलब्ध आहे किंवा कंपनीच्या https://selfhelp.hdfcergo.com/SelfHelp/Authentication/RABGClaimRegistration या लिंकचा वापर करावा. एकापेक्षा जास्त पिके असल्यास ॲप्लिकेशन्स नंबरच्या पुढे पहिल्या पिकासाठी 01 वाढवा, दुसऱ्या पिकासाठी 02 वाढवा, तिसऱ्या पिकासाठी 03 असे टाका किंवा क्रॉप क्रॉप इन्शुरन्स ॲपचा वापर करावा. त्याची लिंक पुढीलप्रमाण आहे. https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
या तिन्ही माध्यमांतून पूर्वसूचना देता न आल्यास तालुका स्तरावरील कृषी विभागास पूर्वसूचना देण्यात यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.