हिवरखेड : मागील 24 वर्षांपासून नगरपंचायत अथवा नगरपरिषदची मागणी पूर्ण होत नसल्याने आता यासाठी पुन्हा हिवरखेड वासियांचे रक्त वाहणार असल्याचे बोलले जात आहे. विदर्भातील सर्वात मोठी असलेली हिवरखेड ग्रामपंचायत नगरपंचायत / नगरपरिषद व्हावी यासाठी मागील 24 वर्षांपासून नागरिकांचा शांततामय मार्गाने अविरत संघर्ष सुरू आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही शासन जाणीवपूर्वक नगरपरिषद ची अंतिम अधिसूचना काढण्यास विलंब करीत आहे. यासाठी आतापर्यंत अनेक आंदोलने, आमरण उपोषणे, अन्नत्याग आंदोलन, निदर्शने, प्रदर्शने, इच्छामृत्यू परवानगी, आत्मदहन इशारा, मूक मोर्चा, मुंडण आंदोलन, बाजारपेठ बंद, रक्तसंकल्प अभियान, अशी अनेक प्रकारची आंदोलने झाली.
एवढेच नव्हे तर हिवरखेड वासीयांनी आपल्या रक्ताने मुख्यमंत्र्यांना व संबंधितांना पत्र सुद्धा लिहिली होती. त्याची दखल घेत शासनाने तात्काळ हिवरखेड नगरपंचायतची उद्घोषणा केली होती. परंतु त्यानंतर ज्यांना हिवरखेड नगरपंचायत नको होती त्या व्यक्तींनी हिवरखेड नगरपंचायत वर स्थगिती आणण्यात यश मिळविले होते. त्यानंतरही हिवरखेडच्या नागरिकांनी लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरूच ठेवला. लोकांच्या मागणीची दखल घेत आमदार अमोल मिटकरी यांनी याविषयी अनेकदा विधिमंडळात आवाज उचलला तसेच आमदार भारसाकडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना नगरपरिषद करण्याबाबत पत्र दिले होते. सामूहिक पाठपुराव्यानंतर हिवरखेड नगर परिषद ची उद्घोषणा सुद्धा शासनाने केली. त्यासाठी सर्व प्रक्रिया पूर्ण केलेली असून जिल्हाधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींची ना हरकत सुद्धा शासनाला दिलेली आहे. परंतु त्याला मोठा कालावधी उलटून गेला असतानाही शासन अजूनही कुंभकर्णी झोपेत असल्यामुळे शासनाला जागे करण्यासाठी आणि येत्या आठवडाभरात हिवरखेड नगरपरिषदची अंतिम अधिसूचना काढण्याच्या मागणीसाठी हिवरखेड वासियांच्या रक्ताच्या धारा पुन्हा वाहणार असल्याची चर्चा आहे. यासाठी हिवरखेडच्या जागरूक नागरिकांतर्फे आणि विविध सामाजिक संघटनांमार्फत लवकरच भव्य रक्तदान शिबिर आयोजित करून रक्तदान केले जाणार आहे. ज्याच्या माध्यमातून शेकडो जणांचे अनमोल प्राण वाचविण्याचे पुण्यकर्म केले जाणार असून हा शासनाला गांधीगिरी मार्गाने संदेश दिला जाणार आहे. सोबतच हिवरखेड वासियांच्या स्वतःच्या रक्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, संबंधित प्रशासकीय अधिकारी, व इतर वरिष्ठांना रक्तरंजित पत्र लिहिण्यात येणार आहे. असा मानस महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीच्या दिवशी हिवरखेड नगरपंचायत / नगरपरिषद समर्थकांनी बोलून दाखविला. त्यामुळे शासनाने जाणीवपूर्वक विलंब न करता तात्काळ हिवरखेड नगरपरिषदची अंतिम अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर करावी आणि हिवरखेड ग्रामपंचायत बरखास्त करावी अशी जागरूक नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसहिता लागण्यापूर्वी हिवरखेड नगरपरिषद न झाल्यास लहान मोठ्या सर्वच स्तरातील लोकप्रतिनिधींना जनतेच्या रोशाचा सामना करावा लागेल अशी दाट शक्यता दिसून येत आहे.