सरत्या जून महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांकात (सीपीआय) वाढ झाली असून हा निर्देशांक 4.81 टक्क्यांवर गेला आहे. भाजीपाला आणि त्यातही टोमॅटोच्या दरात विक्रमी वाढ झाल्याचे सांख्यिकी मंत्रालयाकडून सांगण्यात आले.
महागाई दर नियंत्रणात ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने जे मानक निर्धारित केले आहे, त्याच्या आत महागाई आहे. सलग पाच महिने सीपीआय निर्देशांकात घट झाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच हा निर्देशांक वाढला आहे. सीपीआय निर्देशांकातील खाद्यान्न किंमत इंडेक्स (सीएफपीआय) 2.96 टक्क्यांवरून 4.49 टक्क्यांवर गेला आहे. जून महिन्यात ग्रामीण भागातील महागाई दर 4.72 टक्के इतका होता तर शहरी भागातील महागाई दर 4.96 टक्के इतका होता. उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे भाजीपाला पिकांचे आणि त्यातही टोमॅटोचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर भडकलेले आहेत.
खाद्यान्नाची महागाई कमी झाली नाही तर जुलैमध्ये सीपीआय निर्देशांक सहा टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे. दरम्यान जून मधील औद्योगिक उत्पादनाचे आकडेही आले असून सदर महिन्यात आयआयपी दर 5.2टक्के इतका नोंदविला गेला आहे.