अकोला, दि.17:- नाविन्यपूर्ण संकल्पना व नवउद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणाची प्रभावी अंमलबजावणीसाठी फिरत्या वाहनाव्दारे जनजागृती करण्यात येत आहे. या वाहनाला मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत महाराष्ट्र स्टार्टअप आणि नाविन्यता यात्रा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शनिवार दि. 20 ऑगस्टपर्यंत प्रचार व प्रसार करतील. यामध्ये मोबाईल व्हॅन सोबत असलेले प्रतिनिधीव्दारे नागरिकांना यात्रेबाबतची संपूर्ण माहिती, नावीन्यपूर्ण संकल्पना व त्याचे पैलू तसेच विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल माहिती देईल. याचबरोबर नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या नागरिकांची नोंदणी करुन यात्रेच्या पुढील टप्प्याबाबत माहितीही पुरविण्यात येईल.
मोबाईल व्हॅन यात्रेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालय येथून करण्यात आली. त्यानंतर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलांची), इन्क्यूबेशन सेंटर पंजाबराव कृषी विद्यापीठ व खंडेलवाल विद्यालय येथे जनजागृती करतील. यात्रेच्या उद्घाटनासाठी प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपजिल्हाधिकारी(रोहयो) बाबासाहेब गाढवे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) प्राचार्य राम मुळे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे उपस्थिती होते. तसेच यात्रेचे यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी निशिकांत पोफळी, प्रशांत गुल्हाने व अजय चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले.