जळगाव, 24 मे : दुचाकी किंवा चारचाकी वाहनाला कट लागून मारहाण केल्याच्या घटना तुम्ही वाचल्या असतील. अशीच एक घटना समोर आली आहे. दुचाकीचा चारचाकी वाहनाला कट लागला होता. या घटनेतून वाद झाल्याने 10 ते 15 जणांच्या जमावाने एका महिलेला बेदम मारहाण केली होती. या महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला.
नेमकं काय घडलं –
जळगाव तालुक्यातील दापोरा येथे 18 मेला लग्न होते. यासाठी बाहेरगावाहून चारचाकी वाहनातून दोन जण होते. यावेळी गावात प्रमिलाबाई सोनवणे या महिलेच्या घरासमोर दुचाकीने चारचाकी वाहनाला कट मारला होता. यावेळी प्रमिलाबाईंचा मुलगा विजय हा ओट्यावर बसला होता. मात्र, विजयनेच कट मारल्याचे चारचाकी वाहनाच्या चालकाला वाटले. यानंतर त्याने गाडी पुढे घेऊन शिवीगाळ केली. त्यानंतर चारचाकी वाहन चालकाने लग्नाच्या ठिकाणी 10 ते 15 जणांना घेऊन जाऊन विजयला मारहाण केली.
विजयला मारहाण करत असल्याचे त्याची आई प्रमिलाबाई सोनवणे, भाऊ अरुण आणि विजयची पत्नी प्रियंका धावून आले आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर तरीसुद्धा जमावाकडून या चौघांना मारहाण करण्यात आली. मारहाणीत प्रमिलाबाई जखमी झाल्या आणि जमिनीवर कोसळल्या. यानंतर त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला.
प्रमिलाबाई यांचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण तर शवविच्छेदन केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे, असे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार म्हणाले आहेत. तसेच हा अहवाल मिळाल्यानंतरच नेमकी काय कारवाई करायची हा निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर संशयितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मृताच्या कुटुंबीयांनी केली आहे.