अकोलदि.11:- जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत जिल्हा बालसंरक्षण कक्षाच्या वतीने धडक कारवाई करुन गेल्या सात दिवसांमध्ये चार बालविवाह रोखण्यात आले. या चारही मुलींच्या पालकांकडून हमीपत्र भरुन घेण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकारी राजु लाडुलकर यांनी दिली आहे.
यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, पहिली कारवाई दि.4 मे रोजी मधापूरी ता. मुर्तिजापूर येथे करण्यात आली. यासाठी मुर्तिजापूर पोलिसांची मदत घेण्यात आली. दि.5 मे रोजी हातोल ता. बार्शी टाकळी येथे तर दि.10 मे रोजी वडगाव ता. बार्शी टाकळी येथे एकाच कुटुंबातील दोन विवाह रोखण्यात आले. या प्रकरणी पिंजर पोलीस स्टेशनची मदत घेण्यात आली. लग्न होत असलेल्या अल्पवयीन मुलींच्या वयाची माहिती त्यांच्या शाळेतून घेण्यात आली. त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पालकांना समुदेशन करुन समजावण्यात आले. बालविवाह अधिनियम 2006 बाबत माहिती देण्यात आली. तसेच पालकांकडून हा बालविवाह थांबविण्यासंदर्भात हमीपत्र घेण्यात आली.
या कारवाईत जिल्हा महिला बालविकास अधिकारी विलास मरसाळे, चंद्रशेखर चेके, राजू लाडुलकर, सुनिल सरकटे, निती अहिर, सतिश राठोड, सचिन घाटे, योगेंद्र खंडारे, सुनिल लाडुलकर, रेवत खाडे, संगिता अभ्यंकर, रेशमा मुरुमकार तसेच स्थानिक पोलिसांनी सहकार्य केले.आपल्या परिचयात, परिसरात बालविवाह होत असल्याबाबत 1098 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येते, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी केले आहे.