हिवरखेड: ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायत किंवा नगरपरिषद मध्ये व्हावे यासाठी गेल्या पंचविस वर्षांपासूनच्या सामूहिक लढ्याला आणखी एकदा नवीन वळलं आले असून आज झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी एकजुटीने दोन ग्रामपंचायती करण्याचा तो वादग्रस्त ठराव रद्द करून नगरपंचायत किंवा नगरपरिषद होण्यासाठी पुन्हा एकदा ठराव बहुमताने पारित केला आहे.
हिवरखेड हे गाव चाळीस हजार लोकसंख्येच्या वर असून गावाचे वाढते क्षेत्रफळ पाहता ग्रामपंचायतीचा निधी अपूर्ण पडत आहे गावाला आवश्यक त्या सुख सुविधा उपलब्ध व्हाव्यात व गावचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी येथे नगरपंचायत होणे अत्यन्त आवश्यक आहे. त्यामुळे या मागणीसाठी हिवरखेड मधील सर्व सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्ष, जागरूक नागरिक असं सर्वस्तरातून कार्यकर्ते कार्यरत आहेत. हिवरखेड नगरपंचायत होण्यासाठी ग्रामपंचायतीकडून मागील पंचवीस वर्षात अनेकदा मासिक सभा व ग्रामसभेचे ठराव तत्कालीन सरपंच, सदस्य व नागरिकांनी घेऊन शासन दरबारी सदर मागणी रेटून धरली आहे. याबाबत आमदार अमोल मिटकरी यांनी सुद्धा अनेकदा विधानभवनात याबाबत तारांकित प्रश्न उपस्तीत केला आहे याबाबत नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे यांना सदर प्रश्नावर येत्या ९ तारखेला विधिमंडळात उत्तर दयायचे असल्याचे समजते.
तत्पूर्वी हिवरखेड नगरपंचायत न होता दोन ग्रामपंचायती व्हाव्यात असा ग्रामसभेचा वादग्रस्त ठराव घेऊन मंत्रालयात पाठविण्यात आला होता. सदर ठराव हा नागरपंचायत होण्यास रोडा निर्माण करीत असल्यामुळे आज झालेल्या ग्रामसभेत शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून सदर दोन ग्रामपंचायतीचा ठराव रद्द करून परत एकदा हिवरखेड नगरपंचायत होण्याबाबत ठराव सर्वानुमते मजूर केला यामुळे हिवरखेड नगरपंचायत होण्यापासून एकच पाऊल मागे असल्याचे जाणकारांचे मत आहे.