मुंबई: तिसर्या लाटेत कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्यानंतर सरकारने 15 फेब्रुवारीपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा मुलांवर अन्याय आहे, अशी भूमिका विविध भागांतील शिक्षणतज्ज्ञांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात मांडली आहे. (school lockdown)
आधीच ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांच्या प्रगतीची वाट लागली आहे. त्यांना मोबाईलचे व्यसन लागले आहे. त्यातही अनेक मुले अश्लील चित्रफितीही पाहतात. हे अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे सरकारने शाळा किमान 50 टक्के क्षमतेने तरी सुरू कराव्यात, अशी मागणीही या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
school lockdown : मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे सुरू
मॉल्स, हॉटेल्स, सिनेमागृह, नाट्यगृहे आदी सर्व ठिकाणे 50 टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्याची मुभा दिली. पण शाळा 50 टक्के उपस्थितीत का सुरू ठेवण्यास परवानगी दिली नाही, असा सवाल उपस्थित करत शाळांचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याचे शिक्षणतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
दिवाळीनंतर ते मेअखेरपर्यंत जरी वेळ मिळाला असता, तर प्राथमिक वर्गाचे नुकसान कमी करता आले असते. शाळाबंदी हे शिक्षणाचा अधिकार कायद्याचे सरळसरळ उल्लंघन नाही का, असा सवालही शिक्षणतज्ज्ञांनी केला आहे.
आपल्या देशात निवडणूक जास्त महत्त्वाची आहे; मात्र या निवडणुकीत लाखो नागरिक रस्त्यावर येतात त्यावेळी निवडणूक चालते; मात्र शाळा नको आहेत, असे दिसत आहे. ज्या शाळांमध्ये 30 पेक्षा कमी विद्यार्थी असतानासुद्धा शाळा बंद करण्याची भूमिका घेतली जात आहे हे गंभीर असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ऑनलाईनचा फायदा विद्यार्थ्यांना झालेला नाही. उलट ऑनलाईन शिक्षणामुळे विद्यार्थी मागे पडत आहेत, असे ते म्हणाले.