तामिळनाडूतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर अपघातात प्राण गमावलेले सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि ब्रिगेडियर एलएस लिडर यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. जनरल बिपिन रावत यांना १७ तोफांची सलामी दिली जाईल आणि 800 लष्करी जवान अंतिम संस्कारावेळी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी सकाळी 11 वाजल्यापासून जनरल रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव त्यांच्या दिल्लीतील घरी त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि जनतेच्या अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्या पार्थिवावर पुष्पहार अर्पण केला. अंत्ययात्रा दुपारी 2 वाजता सुरू झाली आहे. बेरार स्क्वेअर स्मशानभूमीत 4 वाजता अंत्यसंस्कार होतील.
त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्वोच्च लष्करी अधिकाऱ्यांनी गुरुवारी पालम विमानतळावर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्कर प्रमुख एमएम नरवणे, नौदल प्रमुख अॅडमिरल आर. हरी कुमार, एअर चीफ मार्शल एव्हीआर चौधरी, संरक्षण सचिव अजय कुमार यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली.
पीएम मोदींनी ट्विट करून लिहिले की, जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलातील इतर जवानांना माझी श्रद्धांजली. त्यांचे अमूल्य योगदान भारत कधीही विसरणार नाही. त्याचवेळी पालम विमानतळावर हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळाली. एका हँगरमध्ये 13 शवपेटी ठेवण्यात आल्या होत्या आणि यावेळी कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींनी दिवगंतांच्या कुटुंबीयांकडे जाऊन त्यांच्याशी काही मिनिटे चर्चा केली.
भारतीय हवाई दलाच्या C-130J विमानाने सुलूर एअरबेसवरून त्यांचे पार्थिव दिल्लीत आणण्यात आले. श्रद्धांजली कार्यक्रमानंतर त्यांचे पार्थिव धौलकुआन येथील लष्करी रुग्णालयात नेण्यात आले. एमआय-17व्ही 5 हेलिकॉप्टर अपघातात जनरल रावत, त्यांची पत्नी आणि ब्रिगेडियर लिडर यांच्याशिवाय 10 सशस्त्र दलाचे जवान शहीद झाले आहेत.
या अपघातात लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, विंग कमांडर पीएस चौहान, स्क्वाड्रन लीडर के सिंग, जेडब्ल्यूओ दास, जेडब्ल्यूओ प्रदीप ए, हवालदार सतपाल, नाईक गुरसेवक सिंग, नाईक जितेंद्र कुमार, लान्स नाईक विवेक कुमार आणि लान्स नाईक साई तेजा यांचा या अपघातात मृत्यू झाला. समाविष्ट आहेत. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह, हे अपघातातील एकमेव बचावले असून, त्यांच्यावर बंगळूर येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.