चेन्नई : तामिळनाडूतील कुन्नूर वनक्षेत्रात काल बुधवारी लष्कराचे ‘एमआय 17 व्ही 5’ हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. यात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत, त्यांच्या पत्नी मधुलिका तसेच लष्कराचे 12 अधिकारी होते. पैकी बिपीन रावत, मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. तर ग्रुप कॅप्टन वरुण सिंह (Group Captain Varun Singh) गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. वरुण सिंह हे एकमेव या दुर्घटनेतून बचावले आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असली तरी स्थिर असल्याची माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज गुरुवारी लोकसभेत दिली.
वरुण सिंह (Group Captain Varun Singh) यांच्यावर वेलिंग्टन येथील मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असून त्यांना लाइफ सपोर्टवर ठेवण्यात आले आहे. त्यांना वाचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
दरम्यान, उपचारासाठी गरज पडल्यास वरुण सिंह यांना वेलिंग्टनमधून बंगळूरमधील कमांड हॉस्पिटलमध्ये हलविण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
ऑगस्टमध्ये वरुण सिंह यांना शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आले होते. गेल्या वर्षी विमान उड्डाणाच्या वेळी मोठी तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. तरीही अशा परिस्थितीत त्यांनी विमान हाताळण्याचे धैर्य दाखविले होते. हवाई आपत्कालीन परिस्थिती असतानाही त्यांनी तेजस फायटर सुरक्षितपणे उतरवले होते.
वरुण सिंह हे मूळचे भोपाळचे आहेत. त्यांनी अदम्य धैर्य दाखवत १० हजार फूट उंचीवरून विमान सुरक्षितपणे उतरवले. आपल्या जीवाची पर्वा न करता वरुण यांनी हजारो लोकांचे प्राण वाचवत लोकवस्तीच्या बाहेर विमान उतरवले होते. आता हेलिकॉप्टर दुर्घटनेत गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.