मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता आणि ‘डेल्टा प्लस’चा मोठ्या प्रमाणावर प्रसार होण्याची भिती लक्षात घेऊन कडक निर्बंध लागू असल्याने राज्यातील ५ जिल्हा परिषद व त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांची प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम आणि नागपूर या जिल्हा परिषदांमधील ७० निवडणूक विभाग आणि ३३ पंचायत समित्यांमधील १३० निर्वाचक गणांमधील पोटनिवडणुकांसाठी १९ जुलै रोजी मतदान होणार होते. परंतु ७ जुलै रोजी राज्य शासनाने कोविडच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुका स्थगित करण्याची विनंती राज्य निवडणूक आयोगाला केली होती.
सर्वोच्च न्यायालयाचे ६ जुलै रोजीचे आदेश आणि राज्य शासनाची विनंती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाकडून कोविडबाबत अधिकची माहिती आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागविले होते. त्याआधारे आयोगाने या निवडणुका आहे त्या टप्प्यावर स्थगित केल्या.
या पोटनिवडणुकांसाठी लागू असलेली आचारसंहितादेखील शिथिल करण्यात आली आहे. कोविडची परिस्थिती सुधारल्यावर या पोटनिवडणुकांचे उर्वरित टप्पे पार पाडण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगातर्फे घोषणा करण्यात येईल, असेही मदान यांनी स्पष्ट केले.