अमरावती : बांधकाम स्थळावरील रेतीच्या वादात मध्यस्थी करणाऱ्या भीमराव तायडे (वय २० रा. चवरेनगर) याची लाकडी रॉप्टरने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. संचारबंदी असताना राजापेठ हद्दीतील न्यू विजय नगरात घडलेल्या या घटनेमुळे गुरुवारी रात्री खळबळ उडाली. आठवड्याभरातील ही दुसरी खुनाची घटना असून राजापेठ हद्दीत घडली आहे.
याप्रकरणी आकाश रुपचंद गेडाम (वय २१ रा. चवरेनगर) राजापेठ पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी दीपक अशोक तुरुक (रा. स्वागतम कॉलनी), संकेत सुरेश घुगे (रा. आदर्शनगर) आणि शिवम शरद कुकडे (रा. फॉरेस्ट कॉलनी, साईनगर) या तिघांना अटक केली आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयाने ७ मेपर्यंतची पोलिस कोठडी सुनावली आहे.
आकाश रुपचंद गेडाम याची बहीण अश्विनी सुनील कटकतलवारे ही न्यू विजय नगरातील हरिहर रामराव बोचरे यांच्याकडे गेल्या एक वर्षांपासून भाड्याने राहते. गुरुवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आकाशचे दाजी सुनील यांनी फोनकरून घरासमोर काही तरुण शिवीगाळ व दगडफेक करत असल्याचे सांगितले. ते ओळखीचे असल्यामुळे लग्न समारंभात असलेला आकाश हा त्याचे मित्र श्रेयस गडेकर, संकेत ऊर्फ गोलु नारळे व वैभव तायडे यांना घेऊन न्यू विजय नगरात पोहोचला. त्यावेळी त्यांनी शिवीगाळ करणाऱ्या दीपक तुरुकला समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपींनी बांधकामस्थळावरील रॉप्टरने हल्ला केल्याने वैभव तायडे जागीच ठार झाल्याचे गेडामने याने तक्रारीत म्हटले आहे.
अधिक वाचा : मलकापुरातील कोविड सेंटरचा वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्णाचा मृत्यू,नातेवाईकांचा आरोप
न्यू विजय नगरातील रहिवासी हरिहर बोचरे हे पाटबंधारे विभागातून सेवानिवृत्त झाले असून, त्यांच्या घराचे बांधकाम स्लॅबपर्यंत आले आहे. तर त्यांच्याच शेजारी राहणाऱ्या नाकोसे यांच्याकडेही एका खोलीचे बांधकाम सुरु असून, ते कंत्राटदार दीपक तुरुक करत आहेत. त्याने नाकोसे यांच्या घरासमोर एक ट्रक रेती आणून टाकली होती. त्यातील काही रेती बोचरे यांच्या घरापर्यंत पसरली होती. ती रेती उचलून घेण्याचे बोचरे यांनी नाकोसेकडील सुपर वायझरला सांगितले होते. परंतु ती रेती वेळवर न उचल्यामुळे बोचरे यांनी त्यांच्याकडील बांधकामाचे साहित्य नाकोसेकडील रेतीवर टाकले. हा प्रकार समजताच कंत्राटदार तुरुकने २९ एप्रिल रोजी दुपारी बोचरे यांना जाब विचारून शिवीगाळ केली. त्यानंतर रात्रीच्या वेळेत दीपक तुरुक हा काही साथीदारांना घेऊन बोचरे यांच्या घरासमोर पोहोचला. त्याने बोचरे यांना शिवीगाळ करून त्यांच्या घरावर दगडफेक केली. हा प्रकार पाहून बोचरे यांच्याकडे भाड्याने राहणाऱ्या सुनील कटकतलवारे यांनी ही माहिती त्यांचा मेहुणा आकाश गेडामला दिली. त्यानंतर तो मित्रांसह तेथे आला. त्याच्यासोबत वैभवही होता. यावेळी झालेल्या वादावादीत त्याचा खून झाला.
घटनेच्या माहितीवरून राजापेठ पोलीसांनी रक्तबंबाळ अवस्थेत पडून असलेल्या तायडेला इर्विन रुग्णालयात नेले. परंतु त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेच्या माहितीवरून पोलिस उपायुक्त शशिकांत सातव, राजापेठचे ठाणेदार मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक किशोर शेळके यांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक गजानन काठेवाडे करत आहेत.