अकोट (शिवा मगर)- कोरोना काळात अध्यापना व्यतिरिक्त प्रशासनाकडून नेमून दिलेल्या आपत्ती व्यवस्थापन संदर्भातील कर्तव्य करत असतांना ३१ डिसेंबर २०२० नंतर कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपयांची विमा रक्कम मिळावी अशी मागणी प्रहारचे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
कोव्हिड-१९ चा प्रादुर्भाव पाहता महाराष्ट्रातील शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत विविध कामासाठी वापरल्या जात आहे. शिक्षकांना नेहमीच महसूल विभाग, आरोग्य विभाग ,निवडणूक विभाग आपल्या विभागाच्या कामासाठी जबाबदारी सोपवीत असतो.पण यावेळी शासनाने कोव्हिड -१९ करीता सेवा बजावणा-या कर्मचाऱ्यांना १४ आँक्टोबर २०२० च्या वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार ५० लाखाचे विमासंरक्षण प्रदान केले होते.पण त्याची मुदत ३१डिसेंबर२०२० ला संपलेली आहे. पण सध्या कोव्हिडची दुसरी लाट आली असून अजूनही शिक्षकांना काँनटँक्ट ट्रेसिंग, कॉल सेंटर, लसीकरण सर्व्हेक्शन ,नाक्यावर तपासणी करीता, कोव्हिड सेंटर वर रुग्ण देखरेख करीता ,माझे गाव माझी जबाबदारी अंतर्गत विविध ठिकाणी सेवा द्याव्या लागत आहेत.या काळात सेवा बजावतांना मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकांना मात्र विम्यापासून वंचित राहवे लागत आहे.
राज्य भरातील बरेच शिक्षकांचा आपत्ती व्यवस्थान कायदा अंतर्गत प्रशासनाने नेमून दिलेल्या कोविड-१९ संदर्भातील प्रतिबंधात्मक उपयोजना करतांना कोरोना बाधित होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. संबंधित मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना ५० लक्ष रुपये विमा रक्कम देण्यासाठी मुदतवाढ न दिल्याने शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मात्र आर्थिक मदत मिळाली नाही.राज्यातील सामान्य शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार शिक्षक संघटना,आता राज्य स्तरावर सदरील मुद्याचा पाठपुरावा करून संबंधित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.तरी संबंधित शिक्षकांना ५० लाखाची विमा रक्कम देण्याकरीता प्रहार शिक्षक संघटना महाराष्ट्र चे राज्याध्यक्ष श्री महेश ठाकरे यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.