नवी दिल्ली: देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. दोन आठवड्यांपूर्वी देशात पहिल्यांदा एका दिवसात १ लाख नवे रुग्ण आढळून आले. त्यानंतर अवघ्या १० दिवसांत हा आकडा २ लाखांवर पोहोचला. यानंतर काल देशात २ लाख ६१ हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, दिल्लीपाठोपाठ उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमधील कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन होणार का याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. यावर गृहमंत्री अमित शहांनी मोजक्या शब्दांत भाष्य केलं आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केंद्र सरकारनं गांभीर्यानं घेतलं. या लाटेकडे दुर्लक्ष करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही, असं अमित शहा म्हणाले. लॉकडाऊनचा निर्णय राज्यांवर अवलंबून असेल. राज्य यासंदर्भात निर्णय घेऊ शकतात, असं शहांनी म्हटलं. ‘भारतच नव्हे, अन्य देशांमध्येही कोरोनाची दुसरी लाट जास्त भीषण ठरली. दुसऱ्या लाटेनं जगभरात प्रचंड मोठी हानी झाली. पण इतर देशांची लोकसंख्या आणि तिथे झालेलं नुकसान पाहता भारतानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात चांगली कामगिरी केली आहे,’ असं गृहमंत्री म्हणाले. ते ‘टाईम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीशी बोलत होते.
सध्या देशात सर्वत्र ऑक्सिजन सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यानं अनेकांचे जीव गेले आहेत. मात्र देशात ऑक्सिजन, रेमडेसिविरचा कोणताही तुटवडा नसल्याचं शहांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्यानं देशातल्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत, असंदेखील ते पुढे म्हणाले. प्रचारसभांमध्ये निवडणूक आयोगानं घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन होत आहे. मोदींच्या सभांमध्ये सर्व नियम पाळले जात असल्याचं शहांनी सांगितलं.